ही भीम जयंती…!

Follow Us on :

ही भीम जयंती…!

डॉ.बाबासाहेब आंबेडकर विश्वपुरूष. त्यांची जयंती . त्याच थाटात होते. जगात त्याला तोड नाही. हा सन्मान. तथागत गौत्तम बुध्दांना मिळाला. त्यानंतर हे दुसरे भारतीय. गरिबांपासून श्रीमंतापर्यंत सारेच साजरी करतात. प्रत्येकाची पध्दती भिन्न असेल. मात्र मनात भाव सारखाच. उध्दारकर्ता. दु:खी माणसाचे अश्रू पुसणे. त्यांचे दु:खहरण करणे. हेच त्यांचे ध्येय होते. त्यासाठी ते शिकले. आयुष्यभर संघर्ष करीत जगले. उपासमार सहन केली. जातीभेदाचे चटके सोसले. तरी डगमगले नाहीत. स्वाभिमान सदैव जपला. स्वार्थासाठी तडजोड केली नाही. अनेक संकटे आली. त्यांना सामोरा गेले.

समाजहिताला कायम प्राधान्य देत. त्यापुढे स्व:ताची आणि, कुटुंबाची पर्वा केली नाही. त्यागाने ते मोठे झाले. घराघरात पोहचले. पहिल्यादा अस्पृश्यांसाठी सत्ता, संपत्ती व प्रशासनात भागिदारी मागितली.अन् लोकमनावर आरूढ झाले. त्याचे दिवसागणिक चाहते वाढत आहेत.असे ते जगातील एकमेव.

न्यायासोबत सामाजिक न्याय ही त्यांची देणं. सामाजिक न्यायाची संकल्पना जगाने अंगिकारली. विषमता आहे. तिथे तिथे सामाजिक न्यायाची गरज आहे.ते विषमता संपविण्याचे कडू औषध आहे. हे ज्या-ज्या राष्ट्रांनी वापरले. ते राष्ट्र प्रगतीच्या शिखरावर पोहतले. जात ही शोषणाची जननी . तिच्यावर घाव घातला. आरक्षण आणलं. त्यातून सामाजिक न्याय आलं. अनेकांना जातीच्या नावावर मिळणारे आरक्षण दिसते. जातीच्या नावावर होणारे शोषण ,अत्याचार, बर्बाद झालेल्या पिढ्या, पदोपदी होणारा अपमान दिसत नाही. हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अनुभवले. प्रत्यक्षात भोगले. त्यामुळेच पहिला प्रहार जाती व्यवस्थेवर केला. मनुस्मृती जाळली. काळाराम मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला. महाड चवदार तळ्याचे पाणी प्याले.

त्या आंदोलनाचा संबंध समता, बंधुभाव, मुलभूत हक्क व मानवी अधिकारांशी होता. जाती व्यवस्थेचे बळी ठरलेल्या 95 टक्के लोकांची चिंता वाहिली. संविधानाच्या माध्यमातून त्या सर्वांना त्यांचे अधिकार बहाल केले. महिलांच्या शोषणाविरूध्द बोलले. त्यांना न्याय दिला. सर्वासाठी शिक्षणाची दारे खुली केली.शिक्षणाचा अधिकार दिला. त्यात महिलाही आहेत. त्याचे परिणाम आहेत. विविध क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात. महत्त्वाच्या पदावर दिसतात. आंदोलनाचं नेतृत्व करतात. नागपुरातचं बघाना.

अंबाझरी उद्यानाजवळ डॉ.बाबासाहेबांचे स्मारक होतं. ते भूईसपाट केलं गेलं. ते पुन्हा उभारा. बिल्डरांना दिलेली जागा परत घ्या. या मागण्यांसाठी महिलांनी पुढाकार घेतला. आंदोलन पुकारलं. ते तीन महिन्यापासून सुरू आहे. या महिलांनी उद्या नागपूरलाच ‘मानवी साखळी ‘ वेढा घातला. तर अनेकांची पंचायत होईल. हे लोण वार्डावार्डात. घराघरात पोहचत आहे. ही आंबेडकरी उर्जा आहे. सरकारने तातडीने तोडगा काढावा.अधिक ताणने सत्ताधाऱ्यांना महागात पडेल.

अमेरिकेने डॉ.बाबासाहेबांचा स्टॅचू उभारला. त्याखाली ‘दं सिम्बॉल ऑफ नॉलेज ” लिहलं. या सन्मानाचे ते मानकरी ठरले. शिक्षणाचे महत्त्व त्यांना कळलं होतं. ते त्यांनी शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविले. लोकशाही दिली. अर्थकारण शिकविले. प्रशासन, राज्य कारभार शिकविला. धर्मनिरपेक्षतेचे धडे दिले. त्यामागे होता सर्वांना समान न्याय. जे या न्यायाच्या शर्यतीत टिकू शकणार नाहीत. त्या अशिक्षित, गरीब, दलित, आदिवासी, वंचितासाठी दिला सामाजिक न्याय. आता स्थिती थोडी वेगळी आहे. आठवा तो 1919 चा काळ . साऊथबेरो कमेटीसमोर बाजू मांडली. तेव्हा पहिल्यादा बाबासाहेबांनी सवर्ण हिंदु आणि अस्पृश्य हिंदूचा मुद्दा मांडला.अन् चळवळ व्यापक केली. येथून न्यायाची लढाई सुरू झाली. सोबत अस्पृश्य हिंदुंना न्याय हवा. तर देव, जाती, कर्मकांड आणि चुकीच्या धर्मातून स्वत:ची सुटका करा. असा अतदीपचा सल्ला दिला.

त्या विचाराची आज अधिक गरज आहे. वर्तमानात सुध्दा छत्रपती घराण्याला वेदोक्त प्रकरणात अपमानीत व्हावे लागते. हे ते ओळखून होते. राष्ट्रवाद बळकटीसाठी धर्मनिरपेक्षता अंगिकारा असाही सल्ला दिला. धर्मनिरपेक्षतेशिवाय मजबूत राष्ट्रवाद नाही. या शब्दात सांगून गेले. कोलिफोर्नियाचे प्रांतिक सरकार जातीभेदा विरूध्द बिल आणत आहे. त्या विरोधात सवर्ण हिंदू मोर्चे काढत आहेत. याचा अर्थ विदेशात गेले. तरी मानसिकता बदलली नाही. ही मानसिकता जातीअंतानेच बदलणे शक्य आहे.

भारतात अलिकडे सत्तेत बुजगावणे बसलेत. त्याचे वर्तन कठपुतळीचे. त्यांना विद्वतेशी देणेघेणे नाही. समतेशी बांधिलकी नाही. त्याचे एकच काम. वर्षभर निवडणूक प्रचार. सत्ता टिकविणे एवढाच ध्यास. बाकी आक्का बसले आहेत ना..! त्यांनी विक्रीचा बाजार मांडला. सरकारी उद्योग बंद. शाळा बंद. सरकारी सेवा बंद.आरोग्य सेवा बंद. सर्वांचे ठोकात खाजगीकरण. हा सामाजिक न्याय संपविण्याचा कुटील डाव . या अगोदर जिल्हा परिषद , नगर परिषदेच्या शाळेत शिकणारे आयएएस, आयपीसी होत. आता ते शोधून सांपडणार नाहीत. दर्जाच घालवला. कॉव्हेन्ट संस्कृती जन्मास घातली. तिचाच सरकारकडून उदोउदो.

यात गावखेड्यातील मुलांचा टिकाव लागत नाही. सामाजिक न्यायाच्या संकल्पनेला मुठमाती . त्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण आणलं. हे धोरण दुसरे, तिसरे काही नाही. विशिष्टांच्या स्पर्धेत अन्य टिकणार नाहीत.अशी पिढी तयार करण्याचा डाव. जेणे करून आहे ती व्यवस्था कायम राहील. इंग्रजित प्राथमिक शिक्षण हवे. तर वर्षाला एक लाख हवेत. रेशनच्या धान्यावर जगणारी 80 कोटी जनता एवढी रक्कम कुठून आणणार. त्यात जाती-जमाती आल्या. याचा अर्थ पहिल्याच स्पर्धत त्यांची मुलें बाद. हा उच्चवर्णियांचा अमृत काली डाव. या चाळणीतूनही काही पुढे गेले. इंजिनिअर, डॉक्टर व्हावयाचं तर चांगल्या कॉलेजात प्रवेश हवा. तिथे वर्षाला दोनतीन लाख रूपये हवेत. उच्च शिक्षण तर स्वप्न ठरत आहे. जी थोडीफार सरकारी मदत मिळत होती. त्यात सरकारने कपात केली. सरकारलाच सामाजिक न्यायाचा तिटकारा. गोरगरीबांच्या हुशार मुलांचे हे बौध्दिक खच्चीकरण आहे. हे लबाडांचे सरकार आहे. बौध्दिक क्षेत्रात देशाला मागे नेत आहे. त्यात सामान्य घरातील हुशार मुलें पिसली जातात. त्यांच्या संधी हिरावून घेणारी ही व्यवस्था आहे. हे संकट संपविण्यास आंबेडकरवादाची गरज आहे. हे लोकांना कळू लागले. त्या सर्वांचा भीम जयंतीत सहभाग वाढत आहे.

जयंती निमित्त वस्त्या सजतील. गावं सजतील. शहरांमध्ये धुम असेल. तरूण-तरूणी डिजेच्या तालावर नाचतील. असंख्ये शब्द सुमने उधळली जातील. गीत, काव्य, लेखांची बरसाद असेल.भाषणांची आतिशबाजी चालेल. रोषणाईने नभ भरेल. निळाची उधळण होईल. निळे ध्वज,पताका फडफडतील. तोरणं लागतील. जयभीमचे नारे गुंजतील. माणसं रस्त्यावर दिसतील. या गोंधळातही संकल्प करणारेही असतील. कोणी उद्यमीचा संकल्प करील. तर कोणी उच्च शिक्षणाचा. काही जण व्यसनमुक्तीचा. ते पुर्ण करण्यास वर्षभर संघर्ष करतील. काम करून शिकणारेही त्यात असतील. त्यांच्या हक्कासाठी लढणारा. अधिकार मिळवून देणारा. त्यांना पदोपदी आठवेल. त्या आठवणीत भीम जयंती साजरी करतील. भारतातातील हे चित्र आता विदेशात पसरले. अनेक देश भीमोत्सव साजरा करतील. त्यात संयुक्त राष्ट्र महासंघासह ब्रिटन, अमेरिका, जपान आघाडीवर असेल.

बाबासाहेबांमुळे शिक्षणाची गोडी वाढली. त्यातील टक्का- अर्धा टक्के व्यक्ती उच्च पदावर पोहचले. त्यांना व्यवस्था छळत आहे. त्यापैकी एक दिल्लीचे प्रा. रतनलाल . त्यांना 14 एप्रिल निमित्त भाषणासाठी ब्रिटनचे निमंत्रण येतं. तिथं त्यांची अनेक शहरात आंबेडकरांवर भाषणं होती. त्यांचा व्हिसा रोखला गेला. अमृत कालवाल्यांना एवढी विचारांची धास्ती आहे.ते सुध्दा पुष्पमाला घालण्यात आघाडीवर असतील. ही दुटप्पी मानसिकता बदलावी. या दिशेने काम व्हावे.ही खरी आदरांजल्ली….!
▪भूपेंद्र गणवीर▪ नागपुर 

News By

  • WH NEWS is an independent digital news platform committed to factual, balanced, and public-interest journalism across Maharashtra. We provide structured reporting on political developments, civic issues, social matters, cultural events, and government updates. Our aim is to present verified information with neutrality, transparency, and professional ethics. All content is published strictly for informational purposes. Views expressed by interviewees are their personal opinions. WH NEWS respects the Constitution of India, the rule of law, and the authority of courts and public institutions. WH NEWS operates independently without external control. Any financial support received is strictly voluntary and accepted only as goodwill support for journalism. No demand, solicitation, pressure, or conditional benefit is ever involved. Contributions are used solely for reporting, production, and operational expenses and never influence editorial decisions.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

यह भी पढ़िए