निष्ठावंत शिवसैनिकांचा होणार सन्मान
युवा सेनेचे सागर देशमुख यांची संकल्पना,अमरावती विभागात राबविले जाणार ‘निष्ठावंत सैनिक गौरव अभियान’
WH-NEWS अमरावती:-सत्ता आणि पैश्यांच्या लालसेपोटे बाळासाहेब ठाकरेंची मुळ शिवसेना सोडून गद्दारांच्या सेनेत सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढत असताना दुसरीकडे बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आजही हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेचे काम करित आहेत. अशा निष्ठावंताची किंमत शिवसेनेला असून युवा सेनेचे विभागीय सचिव सागर देशमुख यांनी अशा निष्ठावंतांचा सन्मान करण्याची संकल्पना पुढे करत ‘निष्ठावंत सैनिक गौरव अभियान’ हाती घेतले आहे.
शिवसेनेत सुरूवातीपासून तळागाळातील शिवसैनिकांची किंमत केल्या जात असून आजही मोठ्या संख्येने शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांचे विचार डोक्यात ठेऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचेच निष्ठावंत म्हणून काम करित आहेत. सत्तेपोटी आपला ‘बाप’ बदलेल्यांची संख्या वाढत असताना देखील अनेक निष्ठावंत बाळासाहेबांवर असलेली अपार श्रद्धा आणि कुठल्याही अपेक्षेशिवाय समाजासाठी काम करण्याचा विचार घेऊन काम करित आहेत. अशा सर्व निष्ठावंत शिवसैनिकांचा सन्मान त्यांच्या घरी जाऊन करणार आहेत. सागर देशमुख यांनी हे अभियान हाती घेतले असून अमरावती विभागातील प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात शिवसेनेशी प्रामाणिक असलेल्या शिवसैनिकांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव केला जाणार आहे.
शिवसेनेचा विचार आणि झेंडा हातात घेऊन अतिशय छोट्या कार्यकर्त्यापासून आमदार, खासदार होईपर्यंत प्रवास असलेले संजय राठोड, आनंदराव अडसूळ, भावना गवळी, प्रतापराव जाधव असे बडे नेते बदललेल्या परिस्थितीत संकटातील शिवसेनेची साथ सोडून गद्दारांच्या सेनेत सहभागी झाले आहेत. असे असताना देखील नेत्यांच्या पाठीमागे न जाता अनेक कडवे शिवसैनिक आजही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मूळ विचारला धरून आपले काम करत आहेत. अशा सैनिकांचा सन्मान करून शिवसेनेत असलेली एकता आणि विचारनिष्ठा अधिक मजबूत करण्यासाठी हे अभियान हाती घेतल्याचे युवा सेनेचे नेते सागर देशमुख यांनी सांगितले आहे.
