मोझरी–जळका रस्त्याच्या नूतनीकरणासाठी नवा प्रस्ताव पाठवणार; बच्चू कडू यांच्या मध्यस्थीने आमरण उपोषण मागे
सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे, पुरुषोत्तम मेश्राम, चंदू वानखडे यांच्या लढ्याला यश
तिवसा WH NEWS (प्रतिनिधी):
मोझरी ते जळका हा रस्ता अमरावती–नागपूर राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी मार्ग म्हणून ओळखला जातो. तसेच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या काळात हजारो भाविकांच्या दिंड्या याच मार्गाने जात असल्याने या रस्त्याचे नूतनीकरण, रुंदीकरण, तसेच मार्गावरील पुलांची उंची वाढविणे आणि धोत्रा ते माळेगाव मार्गावरील दुरुस्ती व पुलांचे बांधकाम करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी चार दिवस आमरण उपोषण केले होते.
या उपोषणाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता विनोद बोरसे यांनी लेखी आश्वासन देत मोझरी ते जळका रस्त्याच्या नूतनीकरणासाठी तसेच संबंधित पुलांच्या बांधकामासाठी नव्या अर्थसंकल्प, नाबार्ड आणि केंद्रीय मार्ग निधी (CRF) यामार्फत प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मध्यस्थीने सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे, पुरुषोत्तम मेश्राम आणि चंदू वानखडे यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले. त्यामुळे चार दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळाल्याचे चित्र आहे.
दरम्यान, रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी काही तातडीच्या उपाययोजना करण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे. मोझरी ते जळका मार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी सूचना फलक लावण्यात येणार असून धोकादायक वळणांवर रात्रीच्या वेळी वाहनचालकांना मार्ग स्पष्ट दिसावा यासाठी रिफ्लेक्टर बसविण्यात येणार आहेत. तसेच शिरजगाव मोझरी येथील नाल्याचे सरळीकरण करून त्या ठिकाणी उंच पुलाचे बांधकाम करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. धोत्रा ते सालोरा मार्गावरील नदीवरील पुलाची उंची वाढविण्यासाठीही नाबार्ड व अर्थसंकल्पीय निधीतून प्रस्ताव पाठविण्याचे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहे.
यावेळी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले की, रस्ते विकासाचे प्रस्ताव प्रशासनाकडून पाठविले जात असले तरी त्यांना मंजुरी मिळवून आणण्यासाठी स्थानिक आमदार व खासदारांनी पाठपुरावा करणे आवश्यक असते. त्यामुळे या सर्व कामांसाठी पुढील काळात आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी सांगितले की, “चार दिवसांचे आमरण उपोषण लेखी आश्वासनानंतर जरी मागे घेतले असले तरी मोझरी, शिरजगाव, धोत्रा, सालोरा, शेंदोळा आणि जळका या गावांच्या रस्त्यांसह विविध समस्यांसाठीचा लढा पुढेही सुरूच राहणार आहे. मोझरी–जळका आणि धोत्रा–माळेगाव या मार्गांवर पुढे होणारे बदल हे या आमरण उपोषणाचेच फलित असेल.”
