‘पोलीस पोलिसांविरोधात निष्पक्ष अहवाल कसा देणार?’ – विजय खवसे यांचा सवाल; सीआयडी चौकशीची मागणी, न्याय न मिळाल्यास हायकोर्टात जाण्याचा इशारा!
नागपूर WH NEWS : राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रारीवर नागपूर शहर पोलिसांनी पुन्हा एकदा स्वतःच स्वतःच्या कारवाईचे समर्थन करणारा अहवाल सादर केल्याने या चौकशीच्या निष्पक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “पोलीस पोलिसांविरोधात निष्पक्ष अहवाल कसा देणार?” असा सवाल करत पत्रकार विजय सीताराम खवसे यांनी आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे सोपविण्याची मागणी केली आहे.
खवसे यांनी सांगितले की, त्यांनी पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल, संबंधित पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांविरोधात अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे तक्रार केली होती. मात्र आयोगाने मागविलेल्या अहवालात पुन्हा पोलिसांनी स्वतःच्या कारवाईलाच योग्य ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या अहवालावर त्यांचा विश्वास नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांना आयोगाने स्वतः दिल्लीला बोलावून प्रत्यक्ष सुनावणी (Hearing) घ्यावी आणि दोन्ही बाजू ऐकून निर्णय द्यावा. केवळ पोलिसांनी पाठविलेल्या अहवालावर निर्णय घेणे योग्य ठरणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विजय खवसे यांनी आरोप केला की, ज्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली, त्याच यंत्रणेकडून चौकशी करून अहवाल सादर करण्यात आला. त्यामुळे या चौकशीत निष्पक्षतेचा अभाव असून आता सीआयडीमार्फत स्वतंत्र चौकशीचे आदेश देण्याची मागणी ते आयोगाकडे पुन्हा करणार आहेत.
तसेच आयोगाकडे पुन्हा सविस्तर हरकत दाखल करून नव्याने चौकशीची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. “पोलिसांवर आता विश्वास राहिलेला नाही. जर आयोगाकडूनही न्याय मिळाला नाही, तर आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्याय मागू,” असा इशाराही विजय खवसे यांनी दिला.
या प्रकरणामुळे नागपूर गुन्हे शाखा पोलिसांच्या चौकशी प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होत असून, आयोग पुढे काय भूमिका घेतो आणि स्वतंत्र चौकशीचे आदेश देतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
