माजी आ. गोपालदास अग्रवाल यांच्या कॉंग्रेस प्रवेशापूर्वीच मविआत वादाची ठिणगी! ◼️गोंदिया विधानसभेवरून शिवसेना-काँग्रेसमध्ये रस्सीखेच
गोंदिया : गोंदिया विधानसभेचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचे काल, (दि.८) जाहीर केले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना (उबाठा) पक्षाला कमजोर असल्याचे सांगत पुढे ही जागा आमच्याच वाट्याला येईल असे म्हटले होते.
त्यांच्या त्या वक्तव्याचा शिवसेना उबाठा तर्फे निषेध नोंदवत ही जागा शिवसेना सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे गोंदिया विधान सभेत उमेदवारीवरून कॉंग्रेस-शिवसेनेत रस्सीखेच सुरु झाली असून अग्रवाल यांच्या कॉंग्रेस प्रवेशापूर्वीच महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पेटल्याचे दिसत आहे.
माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आपण येत्या १३ सप्टेंबर रोजी कॉंग्रेस पक्षात घरवापसी करणार असल्याचे काल, रविवारी जाहिर केले होते. तर गोंदिया विधानसभा क्षेत्राचा जर आपण विचार करतो तर महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून 11 निवडणुकीत काँग्रेस पक्षाने विजय प्राप्त केला आहे. तर दोन निवडणूकांमध्ये भाजपा-शिवसेनेने विजय मिळविला होता. परंतू २०१४ च्या निवडणुकीत भाजपा शिवसेना वेगळेवेगळे लढले असता त्या निवडणुकीत शिवसेनेची अवस्था अतिशय अवघड झाली होती.
आणि आता तर शिवसेनेचे विभाजन झाले आहे. त्या दृष्टीने गोंदिया विधानसभा क्षेत्रात काँग्रेस मोठा पक्ष म्हणून पुढे आला असून गोंदिया विधानसभा हा काँग्रेसचा गड आहे. असे वक्तव्य अग्रवाल यांनी केले होते. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेना उबाठा तर्फे आज, (दि. ९) युवा सेना जिल्हा प्रमुख हरीष तुळसकर यांनी शिवसेनेकडून पत्र परिषदेतून निषेध नोंदवत पक्षप्रवेशा पूर्वी अशा पद्धतीने वक्तव्य करणे योग्य नाही. कॉंग्रेस पक्षातच तीन गुट आहेत तेव्हा ते का करणार, असा प्रश्न करत गोंदिया विधानसभेत आमचा संघटन मजबूत असून आम्ही ही जागा सोडणार नाही.
अशी भूमिका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची असल्याचे स्पष्ट केले आहे. यावरून गोंदिया विधानसभेत जागा वाटपावरून काँग्रेस-शिवसेनेत आत्तापासूनच मतभेद दिसू लागले आहे. त्यामुळे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशापूर्वी महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पेटल्याचे बोलले जात आहे.