प्रासंगिक✍️विनोद देशमुख
—————————————
देऊनच टाका आता
सावरकरांना ‘भारत रत्न’
2014 मध्ये मोदींचे सरकार आल्यापासून गेली नऊ वर्षे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारत रत्न’ उपाधी देण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. ती देण्याचा मुहूर्त आता जवळ आला की काय, असे काही घटनांवरून वाटू लागले आहे.
कारण, सावरकरांच्या नावाला असलेला काही जणांचा विरोध हळूहळू मावळत चालल्याचे दिसत आहे. ही संधी साधून भारत सरकारने ही सर्वोच्च उपाधी यावर्षी सावरकरांना देऊनच टाकावी.
सावरकरांना ही उपाधी देण्यास काॅंग्रेस परिवाराचा विरोध आहे. मणिशंकर अय्यर नावाच्या गांधी कुटुंबभक्ताने केंद्रात मंत्री असताना आणि नसतानाही सावरकरांचा अपमान करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यातूनच प्रेरणा घेऊन युवराज राहुल गांधी 2016 पासून कालपरवापर्यंत माफीवीर शब्द वापरत आले. हिंदुत्ववादी शिवसेनेशी महाराष्ट्रात केलेली आघाडी पुढे टिकवायची असेल तर हे चालणार नाही,
असे आता लक्षात आणून दिले गेल्यावर राहुल मवाळ भूमिका घेणार म्हणतात. याचा अर्थ, काॅंग्रेसचा सावरकर-विरोध तूर्तास काही काळासाठी तरी मावळणार, असे दिसते.
शिवसेना याप्रकरणात प्रारंभापासूनच आग्रही होती. नव्या परिस्थितीत तो आग्रह आव्हानात रूपांतरित झाला आहे, हाच काय तो बदल.
कारण, भाजपा (म्हणजे मोदी आणि शहा) आपल्या मुळावर उठल्याचा उद्धव ठाकरे यांना संशय आहे. शिवसेनेत महाबंड भाजपामुळेच घडल्याचे वाटून, ते आणि त्यांचे प्रवक्ते संजय राऊत हे दोघे (विशेषत: मविआ झाल्यापासून) वारंवार भाजपाला आव्हान देत असतात- “हिंमत असेल तर सावरकरांना भारत रत्न देऊनच दाखवा !”
मविआचा तिसरा घटकपक्ष राष्ट्रवादी काॅंग्रेस यानेही आता या वादात उडी घेतली आहे. पक्षप्रमुख शरद पवार यांनी शनिवारी नागपुरात सावरकरांचे काही मुद्यांवर गुणगान केले. तर, माजी उपमुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवारांनी रविवारी त्याच्याही पुढचे पाऊल टाकले. “सावरकरांना भारत रत्न देऊनच दाखवा” हे आपल्या मित्रपक्षाचे आव्हानच त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या ‘वज्रमूठ’ सभेत दिले. राष्ट्रवादी पक्षाकडून अशा प्रकारचे वक्तव्य प्रथमच आले आहे. सावरकरांच्या मुद्यावर मविआतील त्रिकुटाचे एकमत होत आल्याचे जाणवत आहे. भाजपा-शिवसेना युतीविरुद्ध ही ‘वज्रमूठ’ प्रभावशाली ठरते की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात तशी ‘वज्रझूठ’ ठरते, हे येणारा काळच सांगेल.
या घडामोडी पाहूनच, मोदी-शहांनी ठाकरे-पवारांचे आव्हान त्वरित स्वीकारावे आणि सावरकरांना भारत रत्न देण्याचा मुद्दा कायमचा निकाली काढावा. विरोधकांना आपली ‘वज्रमूठ’ दाखवून देण्याची ही चांगली संधी आहे राजेहो. ठोशास ठोसा समस्त सावरकरप्रेमी ‘भारत रत्ना’ ची वाट पाहत आहे बघा.