Home Blog

राजकीय क्षेत्रात धांगडधिंगा! हवसे, गवसे, नवसे निवडणूक रिंगणात -मोहन गंगण पत्रकार

राजकीय क्षेत्रात धांगडधिंगा! हवसे, गवसे, नवसे निवडणूक रिंगणात -मोहन गंगण पत्रकार

अमरावती – आत्ताच महाराष्ट्रात नगरपालिकेच्या निवडणूका मोठ्या उत्साहात पार पडल्या, आता 2026 च्या मनपा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागताच कार्यकर्त्यांची इनकमिंग, आऊटगोईंग मोठ्या प्रमाणावर सुरु आहे त्याचे मुख्य कारण असे की, प्रत्येक कार्यकर्ता आणि उमेदवाराला असे वाटत आहे की आपण निवडून येणारच आणि त्याचं विश्लेषण सुध्दा योग्य पद्धतीने मांडून दाखवित आहे. असो, यामधे एक महत्वाचे असे की कितीही उमेदवार उभे राहिले आणि छाती ठोकून मीच निवडून येणार असे सांगत असले तरी मनपा मधे जेवढ्या जागा आहे (उदा. आपण अमरावती मनपा चा विचार करु 87 जागेकरीता ही निवडणूक होणार आहे. त्याकरिता अपक्षांसह किमान 1000 ते1100 उमेदवार दंड थोपटतील आणि त्यापैकी 87 च उमेदवार फक्त विजयी होतील ही काळ्या दगडावरची रेघ आहे आणि बाकीच्या उमेदवारांना निवडणूकीत पराजय पत्करावा लागेलच.

सर्वात महत्त्वाचे असे की कोणतीही निवडणूक आता उमेदवारांकरीता सोपी राहिलेली नसून पैशाचा मोठ्या प्रमाणात चुराडा होतो.ज्यांना माहित आहे की आपण या निवडणुकीत निवडून येणार नाही आपले डिपाॅजिट ही आपल्याला वाचवता येणार नाही असे हवसे, गवसे,नवसे सुध्दा शौकाखातर आपले भाग्य आजमावत आहे. महाराष्ट्रात सध्याच्या मनपा निवडणूकीचे मतदान 15 जानेवारी व निकाल 16 जानेवारी ला होणार आहे. मनपा निवडणूक ही महाराष्ट्रात सर्वच जागी चुरशीची होणार आहे कारण 9 वर्षानंतर ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत उभे राहायचे डोहाळे बहुतेकांना लागले आहे गेली चार वर्षापासून अनेकांनी मनपा निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून ठेवले होते ते आता उभे ठाकून आपले भाग्य आजमावणार आहे.ज्याला थोडासा राजकीय गंध आणि आपल्या वार्डातील 5/50 जण ओळखायला लागले की अशांना नगरसेवक ते महापौर व्हायची दिवसाढवळ्या स्वप्ने पडू लागली आहेत मग ते पक्षाचे असोत की अपक्ष युतीत असो वा युतीच्या बाहेर. आता बघा कोणत्याही वार्डात पक्षातर्फे अधिकृत उमेदवार एकच असतो, राष्ट्रीय पक्षाचे जेवढ्या जागा तेवढेच उमेदवार ठरलेले असतात मात्र मनपा निवडणुकीत बर्‍याच ठिकाणी युती न झाल्यामुळे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची मोठ्या प्रमाणात भाऊगर्दी आणि चांदी झाली आहे असं म्हणता येईल! तसेच या मनपा निवडणुकीच्या तोंडावर आयाराम,गयाराम ची स्थिती मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

टिकीट न मिळणार या आशेने अनेक कार्यकर्त्यांचा हिरमुस होतो पण शेवटी राष्ट्रीय पक्षासाठी नाईलाज सुध्दा आहे. मग अशावेळी मला टिकीटच मिळाले नाही म्हणून बंडखोरी करुन अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी करतात कारण अपक्ष म्हणजे स्वतंत्र कितीही उमेदवारांना निवडणूक लढविता येते. चार जण ओळखायला लागले की राजकारणाचा भूत डोक्यात शिरतो आणि निवडणूक लढण्यास सज्ज होतात. आता राष्ट्रीय पक्षाचा विचार केला तर तो पक्ष जो उमेदवार निवडून येऊ शकतो ज्याची जवळपास खात्री असते अशाच होतकरु उमेदवाराला उमेदवारी देतो, मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीचा धांगडधिंगा पाहता एकाच पक्षात एकाच जागेसाठी अनेक उमेदवार निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत म्हणजे “एक अनार सौ बिमार या म्हणीप्रमाणे, मात्र नाईलाजाने इतर उमेदवारांना टिकीट नाकारावे लागते मग पर्यायाने यापैकी काही कार्यकर्ते नाराज होतात आणि अनेकदा त्याचे नुकसान पार्टी ला सहन करावे लागते, कधी कधी तर पक्षाशी एकनिष्ठ असणारी काही राजकीय मंडळी सुध्दा बंडखोरी करतात त्याचप्रमाणे आम्हीच निवडून येणार असल्याचे भासवित आपली उमेदवारी दाखल करून पक्षाशी सुध्दा गद्दारी करतात व कालांतराने पक्षाचे व आपलेच नुकसान करून घेतात अनेक वेळा तर असे होते की आपल्याला आपल्या पक्षाने तिकीट दिले नाही तर ते दुसऱ्या पक्षात पक्ष प्रवेश करतात अशी उदाहरणे राज्यात मनपा निवडणुकीच्या वेळी मोठ्या प्रमाणात घडू लागली आहे आणि ती पहावयासही मिळत आहे,अनेक वेळा अशा कार्यकर्त्यांना पक्षातून निलंबित सुद्धा केल्या जाते. आता आपण हे पाहू की राजकारणात निवडणूका लढविण्यासाठी एवढी भाऊ गर्दी का तर त्याचे महत्त्वाचे कारण असे आहे की राजकारणात अनुभवाची गरज नाही, शिक्षणाची कोणतीही अट नाही,18 वर्षावरील कोणतीही भारतीय नागरिकत्व असलेली व्यक्ती निवडणूक लढवू शकते.

आता थोडं बघा समजा राजकारणात किमान ग्रॅज्युएट,अनुभव आणि वयोमर्यादा ही अट असती, तर राजकारणातील भाऊगर्दी आपसूकच कमी झाली असती परंतु तशी व्यवस्था नाही आणि तुम्ही एकदा निवडून आल्यानंतर कितीही मालमत्ता म्हणजे प्रॉपर्टी कोणत्याही मार्गाने कमवू शकता तसेच तुम्ही विकास करा अथवा करु नका वार्डातील कामे करा किंवा करु नका याचे कोणतेही बंधन नाही. पण काही महत्त्वपूर्ण बाबीचा विचार केला तर त्यावर ही राजकीय मंडळी कधीच विचार करीत नाही जेणेकरून आपल्या क्षेत्राचा विकास होईल. एकदा निवडून आले की निवडणुकीच्या आधि दिलेल्या आश्वासनांचा विसर पडण्यास सुरु होतो आपणाला मतदारांनी आपले अमुल्य मत देऊन निवडून दिले म्हणून आपण महानगरपालिका क्षेत्रातील येणाऱ्या वार्डाचा प्रभागाचा विकास कसा होईल याकडे लक्ष घातले पाहिजे मात्र एकदा निवडणूका झाल्या की नगरसेवक वार्डात फिरकत नाही आणि आपण निवडून आलो व आपली जबाबदारी संपली आपलं 5 वर्षेपर्यंत कुणीही वाकडं करु शकत नाहीत असे वावरतात. मात्र ज्या मतदारांनी निवडणूकीच्या वेळी तुम्हाला डोक्यावर घेतलं “भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है” अशा गगनभेदी घोषणा दिल्या त्या मतदारांचे प्रश्न कसे सुटतील याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे हे विसरुन चालणार नाही.

आज फक्त अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील पाण्याच्या प्रश्नाचा विचार केला तर काय परीस्थिती वाईट आणि बिकट आहे देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षापेक्षा जास्त काळ झाला मात्र जिवनावश्यक असणारे पिण्याचे व वापरा करीता भरपूर पाणी मिळू शकत नाही  एक दिवसा आड येणारा नळ एक तास, दोन तास येतो, त्या नळाला फोर्स नसतो टिल्लू पंप लावून पाणी ओढावे लागते विनाकारण विजेचा खर्च वाढतो.पावसाळा चांगला झाला, लाखो गॅलन लिटर पाणी वाया जात आहे, धरणात पाणी भरपूर आहे तरी सुद्धा एक दिवसाआड जनतेसाठी सोडण्यात येणाऱ्या नळाची चातकासारखी सारखी वाट बघावी लागते लागते ही खरी शोकांतिका आहे आणि आपण विकासाच्या मोठमोठ्या (बाता)गोष्टी करतो हा आहे कां खरा विकास. मनपा क्षेत्रातील नागरिकांचे ज्यांनी आम्हाला डोक्यावर घेतलंय त्या मतदारांचे प्रश्न कसे सुटतील की फक्त निवडणुका तोंडावर आल्या की मग गाजर दाखविले जातात आश्वासनाची खैरात वाटल्या जाते मतदारांना प्रलोभन देऊन 1000/500 रुपयाचे आमिष दाखवून मते आपल्या पदरात पाडून घेतल्या जाते आणि एकदा निवडून आले की पाच वर्ष “हम आपके है कौन” भाड में जाये मतदार जनता अपना काम बनता” या धर्तीवर ही राजकीय मंडळी वावरताना दिसते!

एकंदरीत जर विचार केला तर लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार कोणतेही असो ते चांगलेच असते आपल्या क्षेत्राचा आणि जनतेच्या समस्या सोडविण्याची व विकास करण्याची जबाबदारी ही मतदारांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीचींच असते मात्र अपवादात्मक काही लोकप्रतिनिधी खूप उदासीन असतात त्यांना आपल्या क्षेत्राची काही चिंता फिकीर किंवा देणंघेणं नसते फक्त शौकाखातर राजकारणांत ठाण मांडून बसलेले असतात, महान लोकशाही असलेल्या भारत देशात दर पाच वर्षांनी निवडणुका होतात मात्र अलीकडे ही मनपाची निवडणूक आता नऊ वर्षांनी होत आहे. लाखो करोडो चा खर्च या निवडणुकांवर केल्या जातो अनेक विभागाला मोठ्या प्रमाणावर परिश्रम करावे लागते, निवडणूक स्वच्छ वातावरणात आणि पारदर्शक तसेच निर्भीडपणे पार पडावी याकरिता निवडणूक आयोग कसोशीचे प्रयत्न करतो त्याचप्रमाणे या निवडणुकीचा सर्वात जास्त ताण हा पोलीस विभागावर असतो आदर्श आचार संहितेची अंमलबजावणी करून या निवडणुका आरोग्य रीतीने पार पडाव्या या करीता पोलीस विभागाला डोळ्यात तेल घालून आणि तारेवरची कसरत करुन तसेच वेळप्रसंगी कठोर निर्णय करुन आपले कर्तव्य बजावे लागते. निवडणूकीची सर्वच जबाबदारी शासनाची किंवा पोलिस विभागाचीच आहे असे न पाहता या निवडणुकी दरम्यान उमेदवाराने आणि सुज्ञ मतदारांनी काही गोष्टीचे भान ठेवले पाहिजे आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन केले पाहिजे.

मात्र अलिकडे तसे होताना दिसत नाही. रात्री 10 वाजता पर्यंत प्रचार सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात कर्कश आवाजाचा त्रास शालेय विद्यार्थी, लहान मुले, वरिष्ठ नागरिक, दवाखान्यात भर्ती असणार्‍या रुग्णांना होत असतो वास्तविक प्रचारासाठी संध्याकाळी 6 पर्यन्त ची वेळ भरपूर आहे मात्र रात्री 10 पर्यंत दिलेली वेळ ही चुकीची आहे हे म्हटल्यापेक्षा किंवा हा अतिरेक आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही! आता आपण मुख्य मुद्द्यावर येऊ मतदारांनी मतदानाच्या दिवशी प्रत्येकाने आपला हक्क बजावलाच पाहिजे, मजबूत लोकशाही करता सर्वांनी आपले अमूल्य मत कोणत्याही आमिषाला बळी न पडता योग्य उमेदवाराला देऊन मतदानाचा उत्सव साजरा केला पाहिजे. निवडणुकीत निवडून कोण आणि किती उमेदवार निवडून येतील याचे उत्तर निकाल लागताच मिळेल निवडून आलेल्या उमेदवाराने जल्लोष साजरा करण्यापेक्षा सर्व हेवेदावे विसरुन आपल्या क्षेत्रातील विकासाकडे व जनतेचे मूलभूत प्रश्न कसे सोडविले जातील याकडे लक्ष दिले पाहिजे.

आता या मनपा निवडणूकीचे वास्तव विश्लेषण करायला गेलं तर यां उमेदवारांमधे काही उमेदवार आहेत ते फक्त आपलं शहर सुंदर कसं होईल आपल्या वार्डातील समस्या कशा सुटतील याकडेच त्यांचे लक्ष असते मात्र याउलट काही नगरसेवक एकदा निवडून आले की त्यांच्या मधे गुर्मी, माज, इगो, फोन रिसीव्ह न करणे, हो म्हणून मतदारांची कामे न करणे, वेळ मारून नेणे अशामुळे मतदार नाराज होतो आणि मग मतदारांची नाराजी होते आणि असे नगरसेवकांना पुन्हा डावलल्या जातात. आता आपण म्हणू काही राष्ट्रीय पक्षाचे मातब्बर नेते पक्ष कां बदलतात किंवा इकडून तिकडे म्हणजे भाजपा किंवा युतीत कां जातात तर त्याचे उत्तर असे आहे की जिकडे सत्ता असली तिकडे जर राहिले किंवा गेले तर विकास निधी भरपूर मिळतो, वार्डाचा, आपल्या क्षेत्राचा विकास होऊ शकतो नाहीतर मग विकास निधीसाठी ताटकळत राहावे लागते आणि वार्डाचा आपल्या क्षेत्राचा विकास खुंटतो, मी तर असं म्हणेन की कोणताही नगरसेवक असो त्याने आपल्या वार्डातील प्रत्येक समस्याचे भान ठेवून कार्य व समाजसेवा केली तर पुन्हा निवडून येण्याकरिता कोणीही त्यांना रोखू शकत नाही.

हे खरे ही असले तरी मनपा च्या राजकारणात सुरु असलेला धांगडधिंगा याची मतदारांत मोठी उत्सुकता असून हवसे, गवसे, नवसे निवडणूक लढवून आपल्या पदरात काय पाडून घेतात याकडे अनेकांचे सुज्ञ मतदारांचे लक्ष लागले आहे !  मोहन हि.गंगन. वरिष्ठ पत्रकार मो. 9021529842

लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)चा विदर्भस्तरीय कार्यकर्ता मेळावा नागपुरात उद्या

लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)चा विदर्भस्तरीय कार्यकर्ता मेळावा नागपुरात उद्या
नागपूर | WH NEWS प्रतिनिधी
लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)च्या वतीने विदर्भस्तरीय कार्यकर्ता मेळावा नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा शनिवार, २७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १ ते ५ वाजेदरम्यान राणी झाशी चौक येथील विदर्भ गौरव हिंदी साहित्य भवन येथे पार पडणार आहे.

या मेळाव्याचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. प्रमोदजी कुदळे भूषवणार असून विदर्भातील विविध जिल्ह्यांमधील पदाधिकारी, कार्यकर्ते व पक्ष नेते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात पक्ष संघटन मजबुती, विदर्भातील राजकीय स्थिती, कार्यकर्त्यांची भूमिका, तसेच आगामी रणनीती यावर सविस्तर चर्चा होणार आहे.
मेळाव्यासाठी विदर्भ संपर्क प्रमुख मा. पंकज मनोहर, सचिव मा. प्रशांत नानावे, जनरल सेक्रेटरी मा. अशोक गायकवाड, तसेच युवक आघाडीचे नेतृत्व मा. राणे महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी व प्रमुख पाहुणे यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या विदर्भस्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन नागपूर शहराध्यक्ष मा. बबलूजी कडवे यांच्या वतीने करण्यात आले असून, विदर्भातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

पॉलिसीबाजारचा नागपूरमध्ये विस्तार; मार्केट-लिंक गुंतवणूक आणि टर्म इन्शुरन्सची मागणी वाढली

पॉलिसीबाजारचा नागपूरमध्ये विस्तार; मार्केट-लिंक गुंतवणूक आणि टर्म इन्शुरन्सची मागणी वाढली
नागपूर, 23 डिसेंबर 2025: भारताच्या आघाडीच्या ऑनलाइन इन्शुरन्स प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या पॉलिसीबाजारने आज नागपूर येथे आयोजित प्रेस इंटरॅक्शनमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी पश्चिम भारतात इन्शुरन्स आणि गुंतवणूक प्रोडक्ट्सबद्दल वाढती जागरूकता आणि मागणी असल्याचे सांगितले. तरुण, महत्वाकांक्षी ग्राहक वर्ग आणि मार्केट-लिंक गुंतवणुकीतील वाढती रुची पाहता, नागपूर पॉलिसीबाजारच्या लाईफ इन्शुरन्स आणि गुंतवणूक उत्पादनांसाठी महत्त्वाचा बाजारपेठ बनला आहे.

कंपनीने सांगितले की, भारताच्या व्यापक आर्थिक वाढीमुळे घरगुती खर्च वाढत आहे, लोक वित्तीय बाजारात जास्त सहभागी होत आहेत आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याकडे लक्ष देत आहे. या भागातील ग्राहक महागाईवर मात करणारे परतावे मिळवण्यासाठी इक्विटी-लिंक्ड प्रोडक्ट आणि निवृत्ती नियोजन उपायांकडे वळत आहेत, तसेच आपल्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

या कार्यक्रमात बोलताना, पॉलिसीबाजारचे डायरेक्टर श्री प्रदीप यादव म्हणाले, “पश्चिम भारतात लोकांच्या पैशांविषयी विचार करण्याच्या पद्धतीत स्पष्ट बदल दिसत आहे. आज ग्राहक फक्त संरक्षणावर लक्ष देत नाहीत, तर भारताच्या आर्थिक वाढीत भाग घेण्यासाठी नियोजनबद्ध गुंतवणुकीवरही भर देत आहेत. तरुण लोकसंख्या, वाढते शेअर बाजार आणि वाढती जागरूकता हे मार्केट-लिंक गुंतवणूक आणि निवृत्ती उपायांची मागणी वाढवत आहे. नागपूर, औरंगाबाद, पुणे, नाशिक यांसारख्या शहरांमध्ये आमची उपस्थिती असल्यामुळे आम्ही ग्राहकांना वैयक्तिक मार्गदर्शन देऊ शकतो आणि त्यांच्या जीवनाच्या उद्दिष्टांनुसार, जोखीम क्षमतेनुसार आणि दीर्घकालीन गरजांनुसार योग्य प्रोडक्ट निवडण्यास मदत करू शकतो.”

प्रीमियम माफ करण्याच्या योजनांना वाढती पसंती
तरुण ग्राहकवर्ग आता जास्तीत जास्त इक्विटी-लिंक्ड प्रोडक्ट निवडत आहेत. यामध्ये प्रीमियम माफी (वेव्हर ऑफ प्रीमियम) असलेल्या योजनांची मागणी लक्षणीयरीत्या वाढत आहे. कारण या योजना दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यास आणि आर्थिक संरक्षण देण्यास मदत करतात. या योजनांनुसार, ग्राहक एखाद्या अनपेक्षित परिस्थितीत प्रीमियम भरण्यास सक्षम नसल्यास, विमा कंपनी त्यांच्या वतीने प्रीमियम भरण्याची जबाबदारी घेते. 2023 ते 2025 दरम्यान अशा प्रिमियम माफ करण्याच्या योजनांची मागणी सहापट वाढली असून, आता या योजना पॉलिसीबाजारच्या एकूण बचत व्यवसायाचा सुमारे एक-चतुर्थांश भाग बनल्या आहे.
निवृत्ती नियोजनाची मागणी वाढत आहे

निवृत्ती नियोजनाबाबत सर्वच प्रकारच्या ग्राहकांमध्ये रस वाढत आहे. 2022 पासून निवृत्ती-केंद्रित योजनांसाठी चौकशी दुप्पट झाली आहे. ग्राहक सुरक्षित दीर्घकालीन उत्पन्न किंवा निवृत्ती निधी देणाऱ्या गुंतवणुकीच्या संधी शोधत आहेत, ज्यात मार्केट-लिंक्ड पेन्शन, अॅन्युइटी आणि निश्चित परतावा देणाऱ्या योजना यांचा समावेश आहे.
उच्च उत्पन्न असलेल्या (एचएनआय ) ग्राहकांचा सहभाग वाढत आहे
उच्च उत्पन्न (एचएनआय) असलेले ग्राहक आता ऑनलाइन उपलब्ध असलेल्या बचत आणि टर्म इन्शुरन्स योजनांमध्ये अधिक रस दाखवत आहेत. बचत उत्पादांमध्ये, एचएनआय ग्राहकांचा वाटा आता जवळपास एक-पंचमांश आहे, जे 2023 च्या तुलनेत तीनपट आहे. टर्म इन्शुरन्समध्ये, 2023 पासून एचएनआय ग्राहकांचा मासिक सहभाग 75 टक्क्यांनी वाढला असून, एकूण व्यवसायात त्यांचा वाटा सुमारे एक-पंचमांश आहे.

टर्म इन्शुरन्सची मागणी
टर्म इन्शुरन्सच्या मागणीत सातत्याने मजबूत वाढ दिसून येत आहे. यामागे मुख्यत्वे तरुण आणि वेतनधारक ग्राहक आहेत, जे साधारणपणे वेगाने वाढणाऱ्या उद्योगांमध्ये कार्यरत आहेत. एकूण मागणीत वेतनधारकांचा वाटा सुमारे तीन-चतुर्थांश आहे आणि 2023 ते 2025 या कालावधीत या वर्गात 65 टक्क्यांची वाढ झाली आहे. 25 ते 40 वयोगटातील मासिक ग्राहकांची संख्या दुप्पट झाली असून, लवकर वयात आर्थिक संरक्षणाबाबत वाढती जागरूकता यामधून दिसून येते.
इन्शुरन्सच्या संपूर्ण प्रवासात मदत
पॉलिसीबाजार आपल्या ग्राहकांना विम्याशी संबंधित प्रत्येक टप्प्यावर मदत करण्यावर सातत्याने भर देत आहे. योजना तुलना करण्यापासून ते खरेदी आणि गरजेच्या वेळी क्लेम दाखल करण्यापर्यंत, कंपनी प्रत्येक पावलावर ग्राहकांच्या सोबत उभी आहे. समर्पित सल्लागार आणि क्लेम सपोर्ट टीमद्वारे, कंपनी ग्राहकांना उत्पादनांची वैशिष्ट्ये, पॉलिसीची सविस्तर माहिती आणि अटी व आवश्यक कागदपत्रे स्पष्टपणे आणि आत्मविश्वासाने समजून घेण्यास मदत करते. ही संपूर्ण प्रक्रिया कुटुंबांचा तणाव कमी करण्यासाठी, पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि योग्य वेळी आवश्यक मदत देण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
नागपूर आणि पश्चिम भारतातील इतर प्रमुख शहरांमध्ये इन्शुरन्सविषयीची जागरूकता वाढत असताना, पॉलिसीबाजार ग्राहकांना योग्य माहिती आणि तज्ज्ञ मार्गदर्शन देऊन सक्षम बनवण्याच्या आपल्या ध्येयाला अधिक मजबूत करत आहे.

“पोलीस आयुक्तांची बदली होणे आवश्यकच होते” – माजी पोलीस अधिकारी नितीन मोहोड

“पोलीस आयुक्तांची बदली होणे आवश्यकच होते” – माजी पोलीस अधिकारी नितीन मोहोड

अमरावती, प्रतिनिधी :
अमरावतीचे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या जागी शासनाने राकेश ओला यांची नियुक्ती केल्याबद्दल माजी पोलीस अधिकारी नितीन मोहोड यांनी समाधान व्यक्त केले असून ही बदली अत्यंत आवश्यक होती, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मोहोड यांनी म्हटले आहे की, चावरिया यांच्या कार्यकाळात शहरात भ्रष्टाचारासह गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. जुगार, अवैध दारू व गुटखा विक्री, बूटलेगिंग, ढाब्यांवर व रस्त्यावर खुलेआम दारू पिण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले होते. गुन्हे शाखेची संपूर्ण जबाबदारी एकाच व्यक्तीकडे देण्यात आली होती, तर गुन्हे शाखेचे युनिट क्रमांक दोन बंद करण्यात आले होते. याशिवाय सर्व पोलीस ठाण्यांतील डीबी युनिटही बंद करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या बाजूला गुन्हे शाखेने अवैधरित्या कार्यालय थाटून तिथून सर्व हालचाली केल्या जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. गुन्हे शाखेतील काही कर्मचारी हॉटेल व्यावसायिकांवर दबाव टाकून हप्ते बांधत असल्याच्या ऑडिओ क्लिप्सही यापूर्वी जाहीर झाल्या होत्या, असे मोहोड यांनी सांगितले.

खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन पैसे वसुली केल्याचा अनुभव स्वतःला आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसेच गुन्हे शाखेतील अधिकारी संदीप चव्हाण यांच्या कथित बेकायदेशीर नियुक्तीबाबत पुराव्यासह शासन व पोलीस महासंचालकांकडे तक्रार केल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले होते, असे त्यांनी स्पष्ट केले. चव्हाण यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असूनही 2009 च्या पोलीस महासंचालकांच्या परिपत्रकाचे उल्लंघन करून त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप मोहोड यांनी केला.

शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी व आमदारांनी कारवाईची मागणी केली होती. शिक्षक आमदार जगन्नाथ अभ्यंकर यांनीही याबाबत पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले होते. वर्तमानपत्रांतूनही पोलीस प्रशासनावर सातत्याने प्रश्न उपस्थित करण्यात येत होते, असे मोहोड यांनी सांगितले.

मोहोड यांच्या मते, अमरावतीतील सुमारे 80 टक्के पोलीस कर्मचारी तत्कालीन आयुक्त व गुन्हे शाखेच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. आता नव नियुक्त पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या कार्यकाळात गुन्हे शाखेत निष्कलंक व प्रामाणिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती होईल, अशी अपेक्षा नितीन मोहोड यांनी व्यक्त केली आहे.

नेल्सन लक्सचा नागपुरात शुभारंभ: मातृ व बाल आरोग्यसेवेला नवी दिशा देणारे प्रीमियम हॉस्पिटल और आई आणि बाळांसाठी खास ‘नेल्सन लक्स’ हॉस्पिटलचे नागपुरात उद्घाटन

नेल्सन लक्सचा नागपुरात शुभारंभ: मातृ व बाल आरोग्यसेवेला नवी दिशा देणारे प्रीमियम हॉस्पिटल
और आई आणि बाळांसाठी खास ‘नेल्सन लक्स’ हॉस्पिटलचे नागपुरात उद्घाटन
नागपूर, 13 डिसेंबर 2025:- नेल्सन ग्रुपने नेल्सन लक्स – प्रीमियम मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटलच्या भव्य उद्घाटनाची अभिमानाने घोषणा केली आहे. मातांसाठी जागतिक दर्जाचा प्रसूती अनुभव, नवजात बाळांसाठी अत्याधुनिक बालरोग सेवा तसेच आरामदायक सुविधा देणारे हे हॉस्पिटल नागपुरातील पहिलेच असे आरोग्यकेंद्र ठरणार आहे. “डेशपांडे लेआउट, सेंट्रल अव्हेन्यू येथील नेल्सन लक्स हॉस्पिटलचे उद्घाटन उद्या, रविवार, 14 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12:00 वाजता, माननीय श्री. नितीन गडकरी जी यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी श्री. दत्ता जी मेघे, श्री. सागर जी मेघे आणि हिंगणा विधानसभेचे आमदार श्री. समीर जी मेघे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.”

या हॉस्पिटलच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सी.ई.ओ. डॉ. सोनलकुमार भगत यांच्यासह प्रसूतीशास्त्र, नवजात शिशुरोग (निओनॅटोलॉजी), बालरोग, वंध्यत्व उपचार (फर्टिलिटी) आणि स्त्री आरोग्य यासंबंधी वरिष्ठ तज्ज्ञ आणि सल्लागार डॉक्टरांची टीमही उपस्थित होती.
प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना सी.ई.ओ. डॉ. सोनलकुमार भगत यांनी सांगितले,“नेल्सन लक्स हे केवळ हॉस्पिटल नाही, तर एक परिपूर्ण अनुभव आहे. मातांसह बाळांना सर्वोच्च दर्जाची वैद्यकीय सेवा देताना, त्यांना उबदार, आरामदायक आणि आलिशान वातावरण उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. आमच्या अनुभवी वैद्यकीय डॉक्टरांच्या पाठबळासह आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्ही मध्य भारतात मातृत्व आरोग्यसेवा नव्याने उभारण्याचा प्रयत्न करतो.”

डॉ. सतीश देवपुजारी यांनी सांगितले, “सी.ए. रोडवरील नेल्सन हॉस्पिटल हे मातृ आणि बालरोग सेवेत सुधारणा करण्यासाठी तयार केले गेले आहे, जिथे वैद्यकीय कौशल्यासोबत आराम आणि सन्मान दिला जातो. आमचा उद्देश फक्त उपचार देणे नाही, तर मातांसाठी, नवजात बाळांसाठी आणि कुटुंबांसाठी संपूर्ण काळजीचा अनुभव देणे आहे.”
“बियॉन्ड बर्थिंग” या संकल्पनेतून साकारलेल्या नेल्सन लक्समध्ये अत्याधुनिक वैद्यकीय तज्ज्ञता, आई-बाळांच्या वैयक्तिक गरजेनुसार आखलेली उपचार पद्धती आणि आरामदायक सुविधा एकत्रित करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे प्रत्येक आई आणि बाळाला सर्वोच्च दर्जाची काळजी, लक्ष आणि आराम मिळतो.

मातृ आणि बालरोग सेवेत नवीन मापदंड
नेल्सन लक्सची संकल्पना मातांना सर्वांगीण, सुरक्षित आणि भावनिकदृष्ट्या समाधान देणारा मातृत्वाचा अनुभव देण्यासाठी तयार केली गेली आहे, यामध्ये पुढील सुविधा उपलब्ध आहेत:
अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा
• लेव्हल III नियोनेटल इंटेंसिव केयर यूनिट (एनआयसीयू)
• आधुनिक लेबर डिलिव्हरी रिकव्हरी (एलडीआर) सूट्स
• मुलांसाठी स्वतंत्र बालरोग अतिदक्षता विभाग, मातांसाठी रिकव्हरी रूम्स आणि आपत्कालीन सेवा
• आधुनिक मॉनिटरिंग आणि सुरक्षा प्रणालींनी सुसज्ज उच्च-तंत्रज्ञान ऑपरेशन थिएटर्स
नवीन मातांसाठी आरामदायी सुविधा
• हॉटेलसारख्या सुविधा असलेल्या प्रीमियम रूम आणि सूट्स
• तणाव कमी करून आराम वाढवणारी शांत आणि आकर्षक अंतर्गत रचना
• प्रत्येक आईसाठी खास, वैयक्तिक अनुभव देणारी कस्टमाइज्ड प्रसूती पॅकेजेस
मातृ व बालरोग सेवांचा संपूर्ण पॅकेज
• प्रसूती सेवा आणि उच्च धोका असलेल्या गर्भधारणेची काळजी
• नवजात शिशु व बालरोग सुपर-स्पेशालिटी सेवा
• स्तनपान सल्ला, पोषण मार्गदर्शन आणि प्रसूतीनंतरची काळजी
• वंध्यत्व उपचार व महिलांच्या आरोग्यविषयक दवाखाने
नेल्सन ग्रुप बद्दल
नेल्सन ग्रुप अनेक वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात विश्वासार्ह नाव आहे. मातृ व बालरोग क्षेत्रात 18 वर्षांहून अधिक काळाच्या अनुभवासह, विशेषतः बालरोग आणि नवजात शिशु काळजीत त्याची ओळख आहे.

नेल्सन केवळ या क्षेत्रातील कौशल्यासाठीच नाही, तर भारतभर बालरोग आणि स्त्रीरोग सेवेत नवोपक्रम आणि बदल घडवण्यासाठीही प्रसिद्ध आहे. नेल्सन हॉस्पिटलचे डॉक्टर डॉ. सतीश देवपूजारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करतात, जे पेटंट्स आणि संशोधनासाठी संपूर्ण देशभर ओळखले जातात. नेल्सन लक्स या ग्रुपने प्रीमियम हॉस्पिटॅलिटी आणि जागतिक दर्जाची वैद्यकीय सेवा एकत्र करून मातृ आणि बालकल्याणासाठी नवीन मापदंड निर्माण केला आहे.

रस्ता सुरक्षेसाठी महाराष्ट्राचा अभिनव उपक्रम: ‘झेब्रु’ शुभंकराचे नागपूरात मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

रस्ता सुरक्षेसाठी महाराष्ट्राचा अभिनव उपक्रम: ‘झेब्रु’ शुभंकराचे नागपूरात मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचा शुभंकर ‘झेब्रु’ चे भव्य अनावरण; रस्ता सुरक्षेसाठी
झेब्रु ठरेल ‘रस्ता सुरक्षा जनजागृती दूत’
• नागपूर येथे अनावरण सोहळ्यास मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस आणि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

नागपूर, – : महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचा शुभंकर ‘झेब्रु’ या रस्ता सुरक्षा जनजागृती दूत अभिनव उपक्रमाचा अनावरण सोहळा नागपूर येथे उत्साहात पार पडला. ९ डिसेंबर रोजी विधानभवनमधील कॅबिनेट हॉलमध्ये आयोजित या भव्य कार्यक्रमात राज्यातील तसेच नागपूर परिसरातील अनेक मान्यवर, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘झेब्रु’ शुभंकरचे अनावरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री (परिवहन) माधुरी मिसाळ तसेच परिवहन व बंदरे विभाग, महाराष्ट्र राज्याचे अपर मुख्य सचिव संजय सेठी व परिवहन आयुक्त विवेक भिमनवार उपस्थित होते.

झेब्रु हा महाराष्ट्र राज्याचा अधिकृत रस्ता सुरक्षा जनजागृती दूत आहे. झेब्रा या प्राण्याच्या पट्ट्यांपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेला हा ‘झेब्रु’ रस्ते सुरक्षा, शिस्त आणि वाहतुकीच्या नियमांची जाणीव लोकांमध्ये निर्माण करतो. विशेषतः पादचारी सुरक्षा, झेब्रा क्रॉसिंगचा वापर, हेल्मेट व सीट बेल्ट, वेगमर्यादा पाळणे, लेन शिस्त राखणे, पादचाऱ्यांना प्राधान्य देणे आणि जबाबदारीने वाहन चालवणे या सारख्या मूलभूत नियमांवर झेब्रु प्रभावीपणे संवाद साधू शकतो.

‘झेब्रु’ हा हेल्मेट, सावधानतेची चिन्हे आणि झेब्रा क्रॉसिंगचे प्रतीक असलेला अभिनव शुभंकर असून, तो रस्ते सुरक्षेचा संदेश अधिक प्रभावीपणे देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. समाजात जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश या संकल्पनेमागे आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर महाराष्ट्रात वाहन संख्या देखील वाढत आहे. त्यात मागील काही काळात वाढलेल्या अपघातांची प्रमुख कारणे म्हणजे वाहतूक नियमांचे उल्लंघन. या दृष्टीने ‘झेब्रु’ हा असा शुभंकर आहे, जो सर्व वाहनचालकांचे लक्ष वेधून घेऊन त्यांना नियमांचे पालन करण्याचे महत्त्व पटवून देतो.

मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस म्हणाले “झेब्रु हा फक्त एक शुभंकर नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला जागरूक करणारा संदेशवाहक आहे. रस्ता सुरक्षा ही शासनाची मोहीम असली तरी तिचे यश हे नागरिकांच्या सक्रिय सहभागावर अवलंबून आहे. आपल्या राज्यातील युवक, पालक, शिक्षक आणि समाजमाध्यमांवर सक्रिय असणाऱ्या प्रत्येकाने ‘झेब्रु’चा संदेश पुढे नेला, तर आपण अपघातमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने मोठी पाऊल टाकू शकतो. रस्ता सुरक्षित ठेवणे ही सामूहिक जबाबदारी आहे आणि ‘झेब्रु’ ही जनजागृती अधिक प्रभावीपणे करेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे.’’

परिवहनमंत्री श्री. प्रताप सरनाईक म्हणाले “रस्ता सुरक्षा उपक्रमांना नवे आयाम देण्यासाठी ‘झेब्रु’ हा शुभंकर तयार करण्यात आला आहे. शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आणि डिजिटल माध्यमांतून ‘झेब्रु’ नागरिकांशी थेट संवाद साधेल. वाहतूक नियमांचे पालन करणे हे केवळ दंड टाळण्यासाठी नाही तर स्वतःचे आणि इतरांचे प्राण सुरक्षित ठेवण्यासाठी आहे. महाराष्ट्र परिवहन विभाग रस्ता सुरक्षा संस्कृती दृढ करण्यासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत आहे आणि ‘झेब्रु’ हा त्या प्रयत्नांना एक व्यापक, प्रभावी दिशा देणारा प्रकल्प ठरेल.’’

‘झेब्रु’ शुभंकरच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा हा संदेश सहज, समजण्यासारखा आणि आकर्षक पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे सर्व मान्यवरांनी अधोरेखित केले. विशेषतः युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा संस्कृती रुजविण्यासाठी ‘झेब्रु’ हा उपक्रम महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली. समारोपात “सड़क सुरक्षा -जीवन रक्षा” हा संदेश पुन्हा अधोरेखित करत रस्ता सुरक्षा ही केवळ सरकारी मोहीम नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे आवर्जून सांगण्यात आले.

खैरी पिन्नासे (संगम) येथे भगत परिवाराकडून गरजू नागरिकांना ब्लॅंकेट वाटप; दिवंगत उत्तमराव भगत यांना वाहिली श्रद्धांजली

खैरी पिन्नासे (संगम) येथे भगत परिवाराकडून गरजू नागरिकांना ब्लॅंकेट वाटप; दिवंगत उत्तमराव भगत यांना वाहिली श्रद्धांजली
खैरी पिन्नासे (संगम), ता. नागपूर —
उत्कर्ष ज्ञानविकास बहुउद्देशीय संस्था, नागपूर यांच्या वतीने दिवंगत उत्तमराव भगत यांच्या स्मृतिपित्यर्थ आज दिनांक 12/12/2025 रोजी खैरी पिन्नासे (संगम) ग्रामपंचायतीमध्ये गरजू व आर्थिक दृष्ट्या दुर्बल नागरिकांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.गेली अनेक वर्षा पासून जनार्धन भगत सामाजिक उपक्रम राबवत आहे.


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्रामपंचायत सरपंच श्री. चंद्रशेखर पिन्नासे यांनी भूषविले, तर प्रमुख उपस्थिती म्हणून नानाभाऊ लापकाळे, माजी सरपंच (नागलवाडी) हे राहिले. कार्यक्रमाचे संचालन उपसरपंच राहुल सुधाकर पिन्नासे यांनी केले.
या सामाजिक उपक्रमात भगत परिवारातर्फे जनार्दन भगत, देवानंद भगत, सौ. रजनी भगत तसेच उत्तम किड्स कॉन्व्हेंटच्या प्रिन्सिपल रजनी बगडे, शिक्षिका चित्रा सहारे, महादेव मांदाळे यांची विशेष उपस्थिती होती.
गावातील अनेक गोर-गरीब व गरजू नागरिकांना ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले. लाभार्थ्यांमध्ये बच्छला मौजे, आशाबाई पडघान, लीलाबाई सहारे, बिंदाबाई उगले, सुशीला क्षीसागर, अंजनाबाई कुसवाम, बेबीबाई वानखेडे, भागाबाई राठोड, लक्ष्मीबाई कंगाले, सुमान शेख, परवीन सुमान शेख, कांता बाई वानखडे, विठाबाई वांढरे, धनुबाई साखरकर, बेबीबाई नेवारे, हेमराज भोंडे, बबन लाड, सखुबाई टेटे, लताबाई, निर्मला इखनकर यांचा समावेश होता.
कार्यक्रमास गावातील अनेक नागरिक उत्स्फूर्तपणे उपस्थित राहिले. मानवसेवा आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या कार्याबद्दल उपस्थितांनी भगत परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

ठिय्या आंदोलनाचा इशाऱ्यानंतर तातडीने डीपी मंजूर! -धानोरा दोन येथे १०० केव्हीए तर कडू-पोजगे आणि दहेगाव धानोरा येथे ६३ केव्हीएची डीपी लावली. -प्रशांत कांबळे यांच्या आंदोलनाला यश; प्रशासनाने घेतली दखल

ठिय्या आंदोलनाचा इशाऱ्यानंतर तातडीने डीपी मंजूर!
-धानोरा दोन येथे १०० केव्हीए तर कडू-पोजगे आणि दहेगाव धानोरा येथे ६३ केव्हीएची डीपी लावली.
-प्रशांत कांबळे यांच्या आंदोलनाला यश; प्रशासनाने घेतली दखल

तिवसा: तालुक्यातील १५ गावातील शेतकऱ्यांनी ओव्हरलोड डीपी दुरुस्ती किंवा नवीन डीपी देण्याची मागणी शुक्रवारी ता.२८ नोव्हेंबर रोजी केली होती. मागणीनंतरही तीन दिवस होऊन कारवाई झाली नाही. परिणामी दहेगाव धानोरा डीपीचे ऑइल लिकेज होऊन पेट घेतल्याची घटना रविवारी झाली. यासंदर्भातील माहिती उपकार्यकारी अभियंता अधिकाऱ्यांना माहिती देऊन सोमवारी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी दिला होता. परिणामी उपकार्यकारी अभियंता निलेश उईके यांनी आंदोलची दखल घेऊन तातडीने धानोरा दोन येथे १०० केव्हीए तर कडू-पोजगे आणि दहेगाव धानोरा येथे ६३ केव्हीएचा डीपी बसवण्याचे आदेश दिले.

धोत्रा, शिरजगाव मोझरी गावातील शेतकऱ्यांचे कृषी पंप दहेगाव धानोरा डीपीवर आहे. गेल्या १५ दिवसांपासून या डीपीवरील नादुरुस्तीमुळे शेतकऱ्यांचे रब्बीचे पिक संकटात सापडले होते. हरभरा, गहू आणि पालेभाज्याचे पिकांचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकरी अडचणीत सापडला होता. सोमवारी (ता.१) रोजी शेतकऱ्यांनी पुन्हा उपकार्यकारी अभियंता निलेश उईके यांना निवेदन देऊन ठिय्या आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत डीपी घटनास्थळावर जात नाही तोपर्यंत कार्यालयातून ठिय्या सोडणार नसल्याची भूमिका प्रशांत कांबळे यांनी घेतली होती.

परिणामी उपकार्यकारी अभियंता उईके यांनी तातडीने फोनद्वारे संपर्क करून तातडीने डीपी बसवण्याच्या सूचना दिल्या सोमवारी दुपारी १२ वाजता सुरू झालेल्या या ठिय्या आंदोलनानंतर अर्ध्या तासातच उपकार्यकारी अभियंता उईके यांनी जिल्हा कार्यालयांशी संपर्क करून ६३ केव्हीए डीपी तातडीने लावण्याचे आदेश दिल्याने धोत्रा, शिरजगाव मोझरी गावच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून प्रशांत कांबळे यांनी ठिय्या आंदोलनातून माघार घेतली. यावेळी विजय कुरळकर, एड.विकास तुरकाने, धोत्रा ग्रामपंचायत सरपंच भूषण गाठे, स्वप्नील तुरकाने, अमोल बेंद्रे, प्रभाकर वावरे, भाऊराव वैद्य, सुरेंद्र वाहने या शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

दवलामेटीमध्ये संविधान दिवसानिमित्त भिम शक्ती युवामंचतर्फे दोन दिवसीय समाजप्रबोधन कार्यक्रम

दवलामेटीमध्ये संविधान दिवसानिमित्त भिम शक्ती युवामंचतर्फे दोन दिवसीय समाजप्रबोधन कार्यक्रम
दवलामेटी | WH NEWS प्रतिनिधी
भिम शक्ती युवामंच दवलामेटीच्या वतीने 2014 पासून सातत्याने संविधान दिवसानिमित्त समाजप्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याच परंपरेनुसार याही वर्षी 26 व 27 नोव्हेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत समोरील मैदानावर दोन दिवसीय व्याख्यान व भिमगीत समाजप्रबोधन कार्यक्रम उत्साहात पार पडला.

पहिला दिवस : 26 नोव्हेंबर संविधान व बाबासाहेबांवरील व्याख्यान
पहिल्या दिवशी व्याख्याते मा. जितेंद्र दादा आसोले यांनी “संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात महामानव बुद्ध, राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, माता सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आणि साहित्यारत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना तसेच मालेगाव,नाशिकमधील चिमुकली यज्ञा जगदीश दुसाने हिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राजेश तटकरे, वरिष्ठ पोलीस अधिकारी वाडी पोलिस स्टेशन होते. अध्यक्षस्थानी ममताताई धोपटे, माजी जि.प. सदस्य होत्या. प्रमुख उपस्थितीत माजी सरपंच रिताताई उमरेडकर, रक्षाताई सुखदेवे, सरला चिमोटे, ग्रामविकास अधिकारी माधुरीताई खोब्रागडे तसेच प्रतिष्ठित समाजसेवकांची उपस्थिती होती.

दुसरा दिवस : 27 नोव्हेंबर – ‘भिमक्रांतीचा बुलंद आवाज’ विकास राजा यांचे भिमगीत समाजप्रबोधन
दुसऱ्या दिवशी विकास राजा यांच्या भिमगीत समाजप्रबोधन कार्यक्रमाने वातावरण भारावून गेले. सामाजिक जागृतीचे संदेश देणाऱ्या गीतांनी उपस्थितांना प्रेरित केले.
या कार्यक्रमात ममताताई धोपटे, सरपंच गजानन रामेकर, रिताताई उमरेडकर, छायाताई खिल्लारे, रक्षाताई सुखदेवे, रोशन मेश्राम यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचे यश वाढवले. विशेष सहयोग कैलास बन्सोड, तिरुपती गद्दमवार, भारत सहारे, पवन गुरव, स्कायटेक बिल्डकॉनचे आकाश भारद्वाज, राकेश निकोसे यांनी दिला.
कार्यक्रमाचे आयोजन
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भिम शक्ती युवामंचचे निकेश सुखदेवे, स्वप्निल चारभे, शुभम भालाधरे, समीर सहारे, शुभम गजभिये, अमोल भातुकुलकर, सौरभ नाईक, संगीत करार, राहुल मोडघरे, रोहित राऊत, उमेश सुखदेवे, राज बागडे, वैभव तिरपुडे, विनय गवई, राजू ढोके आणि सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
प्रास्ताविक रिताताई उमरेडकर यांनी केले तर संचालन उषाताई चारभे यांनी केले.आभार : शुभम भालाधरे वैभव तिरपुडे यांनी मानले.
गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
दोन दिवसीय कार्यक्रमाला दवलामेटी ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद देत समाजप्रबोधनाच्या या उपक्रमाला भरभरून दाद दिली.

वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूरमध्ये अत्याधुनिक रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची सुरुवात रुग्णांना पुन्हा वेदनारहित चालण्याची नवी संधी मिसो रोबोटिक सिस्टीममुळे जागतिक दर्जाचे ऑर्थोपेडिक (हाडांचे) तंत्रज्ञान आता आपल्या शहरातच उपलब्ध झाले आहे. ज्याचा फायदा नागपूर, विदर्भ आणि मध्यप्रदेशातील रुग्णांना होईल.

वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूरमध्ये अत्याधुनिक रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची सुरुवात
रुग्णांना पुन्हा वेदनारहित चालण्याची नवी संधी
मिसो रोबोटिक सिस्टीममुळे जागतिक दर्जाचे ऑर्थोपेडिक (हाडांचे) तंत्रज्ञान आता आपल्या शहरातच उपलब्ध झाले आहे. ज्याचा फायदा नागपूर, विदर्भ आणि मध्यप्रदेशातील रुग्णांना होईल.
नागपूर, 26 नोव्हेंबर 2025: अत्यंत अचूक आणि रुग्ण-केंद्रित आरोग्यसेवेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, वोक्हार्ट हॉस्पिटल, नागपूरने मिसो रोबोटिक सिस्टीमसह आपला “कॉम्प्रिहेन्सिव्ह अॅडव्हान्स्ड रोबोटिक नी रिप्लेसमेंट प्रोग्राम” सुरू केला आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अधिक अचूक, सुरक्षित आणि कमी वेदनादायी होते. त्यामुळे गुडघ्याच्या तीव्र संधिवाताने आणि सांध्यांच्या झिजेमुळे त्रस्त असलेल्या रुग्णांना लवकर बरे होण्यास मदत होते आणि त्यांच्या चालण्याची क्षमता सुधारते.

हा कार्यक्रम विदर्भासाठी एक महत्वाचा टप्पा आहे, ज्यामुळे नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, यवतमाळ आणि मध्यप्रदेशातील जबलपूर, छिंदवाडा यासारख्या शहरांमध्ये रुग्णांना जागतिक दर्जाचे हाडांविषयी (ऑर्थोपेडिक) उपचार सेवा मिळू शकणार आहे. या रोबोटिक सिस्टीममुळे वोक्हार्ट हॉस्पिटल रुग्णांना कमी दुखापतीची शस्त्रक्रिया आणि लवकर बरे होण्याची सुविधा देऊन त्यांना वेदनाशिवाय आणि आत्मविश्वासाने आपल्या दैनंदिन आयुष्यात परत येण्यास मदत करेल.

कॉम्प्रिहेन्सिव्ह अॅडव्हान्स्ड रोबोटिक नी रिप्लेसमेंट प्रोग्रामचा भाग म्हणून, वोक्हार्ट हॉस्पिटल, नागपूर रुग्णांना शस्त्रक्रियापूर्वी आणि शस्त्रक्रियेनंतर सुरक्षित आणि सुलभ काळजी देते. रुग्णांची सविस्तर वैद्यकीय तपासणी, डिजिटल इमेजिंग आणि रोबोटिक नियोजन करून प्रत्येक शस्त्रक्रिया रुग्णाच्या वैयक्तिक गरजेनुसार केली जाते. शस्त्रक्रियेनंतर, लवकर बरे होण्यासाठी लवकर हालचाल, वेदना नियंत्रण आणि नियोजित फिजिओथेरपीवर विशेष लक्ष दिले जाते. वैयक्तिक फिजिओथेरपी सत्रांमुळे रुग्णांची ताकद, संतुलन आणि चालण्याची क्षमता सुधारते, ज्यामुळे ते आपल्या दैनंदिन कामकाजात लवकर आणि आत्मविश्वासाने परत येऊ शकतात.

या कार्यक्रमाचे उद्घाटन वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या मॅनेजिंग डायरेक्टर सुश्री जहाबिया खोराकीवाला, वोक्हार्ट हॉस्पिटल्सचे ग्रुप सीईओ डॉ. पराग रिंदानी, आणि वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूरचे सेंटर हेड श्री. रवी बाघली यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमात या क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांनी आपले मार्गदर्शन केले, ज्यामध्ये डॉ. रोमिल राठी, डॉ. मुकुंद अग्रवाल, डॉ. लघवेंदु शेखर, डॉ. आशिष ठाकूर, डॉ. स्वप्नील गाडगे, डॉ. शांतनू देशमुख आणि डॉ. अंबर दावरे हे रोबोटिक ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन उपस्थित होते.
रोबोटिक गुडघा प्रत्यारोपणाचे प्रमुख फायदे आणि वैशिष्ट्ये
मिसो रोबोटिक सिस्टीममुळे वोक्हार्ट हॉस्पिटल्स अचूक ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात आघाडीवर आहे. हे रुग्णांना अनेक फायदे देते, जसे की:
• इम्प्लांट बसवताना अधिक अचूकता आणि योग्य संरेखन
• मांसपेशींना कमी इजा आणि शस्त्रक्रियेतील रक्तस्राव कमी
• शस्त्रक्रियेनंतर वेदना कमी होतात आणि लवकर रिकव्हरी होते
• रुग्णालयात राहण्याचा वेळ कमी होतो, ज्यामुळे रुग्ण लवकर दैनंदिन जीवनात परत येऊ शकतात
• तसेच इम्प्लांट जास्त काळ टिकतो ज्यामुळे चालण्याची क्षमता सुधारते आणि दीर्घकालीन समाधान मिळते.
प्रगत 3D व्हिज्युअलायझेशन आणि शस्त्रक्रियेच्या वेळेची माहिती वापरून हे रोबोटिक सिस्टीम प्रत्येक रुग्णाच्या गुडघ्याच्या रचनेनुसार शस्त्रक्रिया व्यक्तिगत पद्धतीने करण्यास सक्षम बनते. त्यामुळे हाडांची कापणी अचूक होते आणि सांध्यातील लिगामेंट्स योग्य संतुलनात राहतात, ज्यामुळे उपचारांचे परिणाम अधिक दीर्घकाल टिकतात.
सुश्री जहाबिया खोराकीवाला, मॅनेजिंग डायरेक्टर, वोक्हार्ट हॉस्पिटल्स म्हणाल्या:“वोक्हार्टमध्ये आमचे उद्दिष्ट नेहमीच तंत्रज्ञानासोबत रुग्णांची काळजी घेऊन सर्वोत्तम आरोग्यसेवा देणे आहे. नागपूरमध्ये रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण सुरू करणे म्हणजे मध्य भारतातील रुग्णांना अत्यंत अचूक आणि कमी दुखापतीची शस्त्रक्रिया त्यांच्या स्वतःच्या शहरात उपलब्ध करून देण्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.”
डॉ. पराग रिंदाणी, ग्रुप सीईओ, वोक्हार्ट हॉस्पिटल्स म्हणाले:“रोबोटिक्स हा ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियेचा भविष्यातला मार्ग आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण फक्त शस्त्रक्रियेची अचूकता वाढवत नाही तर रुग्णांच्या बरे होण्याच्या अनुभवालाही सुधारतो. ही प्रगती आमच्या वैद्यकीय उत्कृष्टतेच्या बांधिलकीची पुष्टी करते आणि ज्या प्रत्येक भागात आम्ही सेवा देतो तिथे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा पोहोचवण्याच्या आमच्या दृष्टीकोनाची खात्री देते.”

श्री. रवी बाघली, सेंटर हेड, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर म्हणाले:“ मिसो रोबोटिक सिस्टीमची सुरवात नागपूर आणि विदर्भासाठी अभिमानाचा क्षण आहे. आता रुग्णांना अत्याधुनिक गुडघा उपचारांसाठी मेट्रो शहरांमध्ये जाण्याची गरज नाही. ते आता येथेच, नागपूरमध्ये, जागतिक दर्जाची रोबोटिक शस्त्रक्रिया करू शकतात, ज्यामुळे रुग्ण लवकर बरा होतो आणि परिणाम चांगले मिळतात.”
About Wockhardt Hospital:
Wockhardt Hospitals is a chain of tertiary care super-specialty hospitals with facilities in, Nagpur, Rajkot, South Mumbai and North Mumbai. All Wockhardt Hospitals have state-of-the-art infrastructure and globally benchmarked processes to enable Patient Care & Safety. Wockhardt Hospitals Ltd. is one of the few professionally managed corporate hospital groups in the country which prioritises patient safety and quality of care at the core of its strategy. The overall 1100 bedded hospitals & has over 1000 Standard Operating Procedures or Protocols for both clinical and non-clinical processes in place. The guiding philosophy is to serve and enrich the Quality of Life of patients.