हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

२०२४चा महासंग्राम आणि नव्या भारताच्या निर्मितीसाठी.. – ज्ञानेश वाकुडकर

spot_img

२०२४चा महासंग्राम आणि
नव्या भारताच्या निर्मितीसाठी..

ज्ञानेश वाकुडकर
•••
(‘राष्ट्रप्रथम’ या वार्षिकांकाच्या प्रथम दिवाळी अंकासाठी लिहिलेला हा विशेष लेख.. साभार. संपादक – चंद्रकांत झटाले)

राहूल गांधी यांची पदयात्रा जोरात आहे. प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. राहूल गांधी लोकात मिसळत आहेत. गांधी घराण्याचे ग्लॅमर त्यांच्याकडे जन्मजात होते, पण या पदयात्रेमुळे ते लोकनेते होण्याच्या दिशेने निघाले आहेत. या दृष्टीने त्यांचा पुढील प्रवास महत्वाचा असेल.

मोदी यांच्या राष्ट्रीय राजकारणातील उदयानंतर देश एका मोठ्या संकटात सापडला आहे. आज हुकुमशाहीचा धोका समोर स्पष्टपणे दिसतो आहे. पण सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय अनर्थाची सुरुवात २०१३ पासूनच झालेली आहे. गोवा अधिवेशनात मोदी यांना भाजपाने प्रचार प्रमूख नियुक्त केले होते. मोदी यांच्या दबावापुढे संघ झुकला आणि संजय जोशी यांना पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीतून काढले होते. आणि त्याचक्षणापासून पक्षात मोदी यांची मनमानी सुरू झाली.

२०१४ला भाजपा सत्तेत आली. मोदी पंतप्रधान झाले. आणि हिंदुत्ववादाच्या नावाने सनातनी हिंदू किंवा गोडसेवादी हिंदूनी देशात थैमान घालायला सुरुवात केली. मॉब लिंचीग सुरू झाले. गोमांसाच्या बहाण्याने विशिष्ट समुदायाच्या घरात घुसून हत्या करण्यात आल्या. तालिबान्यांचा भारतीय अवतार देशात बघायला मिळाला.

Advertisements

संघ ही भाजपची मातृसंस्था आहे. मोदी हे संघाचे प्रॉडक्ट आहेत. अडवाणी यांच्या रथयात्रेने देशभर जी विषाची पेरणी केली होती, त्याला आलेलं विनाशी फळ म्हणजे मोदी! गुजरात दंग्यानंतर मोदींना मुख्यमंत्री पदावरून हटवू नये, यासाठी खुद्द अडवाणी दबाव टाकत होते. त्याच अडवाणींचा पाणउतारा मोदींनी प्रधान मंत्री होताच केल्याचे देशाने पाहिले आहे.

मोदी यांची एकूणच राजकीय, आर्थिक नीती अफलातून आहे. कसलीही पूर्वतयारी न करता जाहीर केलेली नोटबंदी, शेखचील्लीप्रमाणे अचानक जाहीर केलेले लॉक डाऊन, जीएसटीचा गोंधळ, करोना काळातील अंदाधुंद निर्णय, गंगेतून वाहणारी असंख्य लावारिस प्रेतं, सैतानी कृषी कायदे, शेतकरी आंदोलकांच्या अंगावर मंत्री पुत्राने राजरोस गाडी घालणे, बुलडोझर, विरोधकांच्या बाबतीत इडीच्या कारवाया, ब्लॅक मेल करून आमदार फोडणे, सरकारं पाडणे इत्यादी प्रकार अत्यंत संतापजनक आहेत. आणि धडधडीत खोटं बोलणे, हा तर त्यांचा आवडीचा विषय आहे. सत्तेचा उन्माद ठासून भरला आहे. ’या देशात आता आम्ही म्हणू तेच होईल, बाकी सारे गुलाम आहेत. देश हा दोन चार लोकांची खाजगी प्रॉपर्टी आहे’ अशा आविर्भावात सत्ताधारी वागत आहेत. मुख्य मिडिया पूर्णतः खरेदी केला गेला, न्यायव्यवस्था बटिक झाली. मोदी, शहा, योगी आणि संघ मोकाट सुटले. मागचा पुढचा कसलाही विचार केला नाहीत.

एकंदरीत देश एका भयंकर संकटात सापडलेला आहे. २०२४ची निवडणूक देशाचे, लोकशाहीचे भवितव्य ठरवणारी निवडणूक असेल. यावेळी जर मोदी – शहा यांच्या तावडीतून देश सोडवता आला, तरच लोकशाही जिवंत राहील. देश बर्बाद झालाच आहे, तो पुन्हा सावरता येईल, पण त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागेल. सर्वच क्षेत्रात नवी आणि विवेकपूर्ण मांडणी करावी लागेल. समाजात परस्पर विश्वासाचे वातावरण तयार करावे लागेल. न्यायव्यवस्था स्वच्छ करावी लागेल. धर्माचा उन्माद आणि अन्य धर्मीयांचा द्वेष अगदी शिगेला पोचला आहे, त्यातून मार्ग कसा काढता येईल, यावर चिंतन झाले पाहिजे. त्यासाठी नव्या, प्रामाणिक आणि दूरदर्शी नेतृत्वाची देशाला गरज आहे. त्या दृष्टीने आपली काय तयारी आहे, यावर आपले भवितव्य अवलंबून आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की, कोणत्याही प्रस्थापित पक्षाकडे याबाबतीत ठोस असा कुठलाही कार्यक्रम दिसत नाही. केवळ एक दुसऱ्यावर आरोप केल्याने देशाचे प्रश्न सुटणार नाहीत. उलट ते आणखी गंभीर होतील. निदान आतातरी आपण भानावर आले पाहिजे.

Advertisements

आम्ही ’लोकजागर’ तर्फे बारा कलमी कार्यक्रम तयार केला आहे. त्यावर विचारवंतांनी, राजकीय नेत्यांनी, युवकांनी, समाजसेवी संस्थांनी, उद्योगपतींनी, महिलांनी, शेतकरी आंदोलकांनी गांभीर्याने विचार करावा, अशी अपेक्षा आहे. (’समतावादी हिंदू धर्म आणि नवा भारत’ या पुस्तकात ’लोकजागर’ ची भूमिका सविस्तर मांडली आहे. तेच आमचे व्हिजन डाक्युमेंट आहे, असे म्हणता येईल.)

लोकजागरचा बारा कलमी कार्यक्रम
१) माझा धर्म – माझ्या घरात, माझ्या मनात!
२)झिरो ते हिरो अर्थव्यवस्था
३) जनतेचा उमेदवार, लोकांची लोकशाही
४) गाव तिथे उद्योग, घर तिथे रोजगार
५) कृषी धर्म, कृषी संस्कृती
६) सामाजिक उद्योग, सामाजिक सरकार
७) मोफत शिक्षण, मोफत आरोग्य
८) एक गाव, एक परिवार
९) युवा भारत, नवा भारत
१०) गतिशील न्यायालये, पारदर्शी न्याय
११) प्रगत महिला, समर्थ समाज
१२) सर्वसमावेशक समाज, सर्वसमावेशक सत्ता

आपण एका एका मुद्याचा स्वतंत्र पणे थोडक्यात विचार करू.

Advertisements

१.*माझा धर्म – माझ्या घरात, माझ्या मनात*
धर्मांधता ही कमी अधिक प्रमाणात जगाचीच समस्या झालेली आहे. मूळ धर्माची शिकवण कितीही उदात्त असो, त्याला विकृत करणारे काही लोक प्रत्येक धर्मात असतात. जसे तिकडे तालिबानी आहेत, तसेच म्यानमार, श्रीलंका या देशात बुद्ध धर्मियांची सत्ता आहे. त्यांच्या अतिरेकाच्या कहाण्या काही नविन नाहीत. पण त्यात धर्माचा दोष नाही. त्यासाठी एखाद्या धर्माला, जाती समूहाला सरसकट दोषी ठरविणे योग्य नाही. भारतात देखिल हिंदुत्वाच्या नावावर काही धर्मांध शक्तींनी धुमाकूळ घातला आहे.

भारतामध्ये हिंदू धर्मियांची संख्या ७८ टक्के म्हणजेच सुमारे ११० कोटींच्या घरात आहे. त्यात काही मोजके लोक तालिबानी प्रवृत्तीचे आहेत. त्यांच्या पापासाठी सरळ सरळ हिंदू धर्माला टार्गेट करणे, ही तथाकथित बुद्धिजीवी किंवा अर्धवट पुरोगामी लोकांची सर्वात मोठी चूक आहे. काही मोजके आंबेडकरवादी आणि काही बामसेफी लोक यात आघाडीवर आहेत, असे दुर्दैवाने सांगावे लागते. त्यांची भूमिका स्पष्टपणे संघाच्या फायद्याची आहे, हे त्यांना कळत नाही.

प्रत्येक धर्मात गट तट आहेत. वैज्ञानिक मांडणी असणारा बुध्द धर्मही त्याला अपवाद नाही. अशावेळी बुद्ध धर्मियांनी हिंदू धर्मीय लोकांना दोष देत बसण्यापेक्षा आपाल्या धर्मात घुसलेल्या विकृतीचा विरोध करणे, जास्त योग्य आहे. बुद्ध धर्मात १. महायान, २. हीनयान, ३. नवयान असे पंथ, प्रवाह आहेत. तसेच हिंदू धर्मात देखिल अनेक पंथ आहेत आहेत. मुठभर वैदिक/मनुवादी/सनातनी हिंदू सोडले तर बाकी सर्व समतावादी प्रवाह आहेत. गम्मत म्हणजे योगी आदित्यनाथ ज्या नाथ संप्रदायाचे आहेत, तो संप्रदाय देखिल मुळात मनुवादी/सनातनी हिंदू धर्माचा कट्टर विरोध करण्यासाठीच स्थापन झालेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंडे ही नाथ संप्रदायाची आहे. उच्चवर्णीय असूनही इथल्या मनुवादी उच्चवर्णीयांनी त्यांचा कसा छळ केला, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मुळात ती लढाई जातीची नसून प्रस्थापित विरूद्ध विस्थापित, संस्कृती विरुद्ध विकृती अशी आहे. जसा समतावादी संत तुकाराम महाराजांचा खून इथल्या वर्णवादी सनातन्यांनी केला, तसाच तशीच संत ज्ञानेश्वरांच्या आईवडिलांना घ्यायला लावलेली जलसमाधी हा देखील खुलेआम खूनच होता. चक्रधर स्वामींच्या बाबतीत देखील हेच घडले. म्हणूनच हिंदू धर्माचे दोन मुख्य प्रवाह आम्ही मानतो.
१. समतावादी हिंदू
२. वर्णवादी/सनातनी/मनुवादी हिंदू (’ब्राम्हण्यवादी हिंदू’ हा शब्द मला योग्य वाटत नाही. त्याला जातीवाचक वास आहे. आणि विकृती तर प्रत्येक जातीमध्ये आढळते.)

तुमचा धर्म कोणताही असू द्या, कितीही महान असू द्या, मात्र तो तुमच्या घरापर्यंतच मर्यादित असू द्या. तुमच्या मनात असू द्या. त्याचे बाहेर प्रदर्शन नको, अशी ठाम भूमिका आपल्याला राजकीय आणि सामाजिक पातळीवरून घ्यावी लागेल. धर्माचा तिरस्कार किंवा द्वेष न करता, त्याचा सकारात्मक उपयोग करून घ्यावा लागेल. समाजाला व्यापकपणे बांधून ठेवणारा धर्मासारखा मजबूत धागा आजतरी दुसरा कोणताही नाही!
२. झीरो ते हिरो अर्थव्यवस्था
मोदी यांच्या एकूणच अनागोंदी कारभारामुळे देशाची अर्थव्यवस्था बर्बाद झालेली आहे. राष्ट्रीय संपत्ती कवडीच्या भावाने विकली गेलेली आहे. देश अक्षरशः कंगाल करून सोडला आहे. अशावेळी आपल्याला शुन्यातून सुरुवात करावी लागेल. नवी उभारणी करावी लागेल. त्यासाठी शेवटच्या माणसाला विश्वासात घ्यावे लागेल. त्याच्या सहभागाशिवाय पुढील उभारणी कठीण आहे. सार्वत्रिक सहभाग असलेली नवी अर्थव्यवस्था आणावी लागेल.
३. जनतेचा उमेदवार, लोकांची लोकशाही
आमदारांची खरेदी विक्री हा मोदी-शहा यांच्या राजकारणाचा मुख्य फंडा आहे. त्यासाठी सरकारी संस्थांचा दुरुपयोग आणि ब्लॅक मेलिंग हा सरळ मार्ग त्यांनी स्विकारला आहे. सद्याचे लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात भ्रष्ट असल्यामुळे ते साहजिकच शरण जातात. त्यांच्या पायावर लोटांगण घालतात.
हे नको असेल, तर आपल्याला ’नंबर दोनवाल्यांची/ धनदांडग्यांची लोकशाही’ ’गरिबांच्या लोकशाही’मध्ये परावर्तित करावी लागेल. त्यासाठी जनतेमधून प्रमाणिक उमेदवार द्यावा लागेल. प्रचारासाठी जनतेचा सहभाग आणि सहयोग असावा लागेल.
४. गाव तिथं उद्योग, घर तिथं रोजगार
भारत हा खेड्यांचा देश आहे. ६० टक्के जनता खेड्यात राहते. खेड्यात शेतीशिवाय दुसरा व्यवसाय नाही. उद्योग नाहीत. त्यामुळे शेतीवर अतिरिक्त भार पडतो. मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते. शहरं फुगत आहेत. खेडी ओस पडत आहेत. यावर उपाय म्हणजे शेतीवर आधारित उद्योग खेड्यापाड्यातून उभे करावे लागतील. छोटे छोटे गृहोद्योग ग्रामीण भागात काढावे लागतील. शहरात उद्योगांची गर्दी कमी करावी लागेल. जागेचे भाडे, मजुरी इत्यादी बाबतीतला खर्च ग्रामीण उद्योगामुळे मोठया प्रमाणात कमी होईल. उत्पादन खर्च कमी झाल्यामुळे बाहेरच्या स्पर्धेत आपल्याला उतरता येइल. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल. ग्रामीण भागातील शाळा, इतर व्यवसाय, शेती यासाठी पुरक वातावरण तयार होईल. रस्तेही चांगले होतील, विजेच्या सोयी देखील होतील. एकूणच ग्रामीण विकासाला चालना मिळेल.
५. कृषि धर्म, कृषी संस्कृती
शेती, निसर्ग आपल्याला सर्वकाही देतो. अन्न, निवाऱ्यासाठी लाकूड, फळं, फुलं, सावली, प्राणवायू, पाऊस अशा जीवनोपयोगी गोष्टी त्यापासून मिळतात. म्हणूनच शेतकरी हा शेती किंवा निसर्गपूजक आहे. शेतीच्या विविध टप्प्यावर पूजा केली जाते. पेरणी करण्याआधी पूजा, पीक काढण्याआधी पूजा, घरी आणताना पूजा वगैरे. तोच त्याचा धर्म आहे. तीच त्याची संस्कृती आहे. जगातील कोणताही धर्म किंवा देव आपल्याला ह्या साऱ्या गोष्टी देऊ शकत नाही.
६. सामाजिक उद्योग, सामाजिक सरकार
सध्या उद्योग हा लूट आणि प्रचंड नफेखोरीच्या विकृतीने ग्रासला आहे. गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत आहे. हे बदलावे लागेल. उद्योग असो की सरकार समाजहित हीच त्याची मुख्य प्रेरणा असली पाहिजे. उद्योगातून येणाऱ्या नफ्यामध्ये कच्चा माल उत्पादकासह त्यात सहभागी घटकांचा देखिल उचित वाटा असला पाहिजे.
७. मोफत शिक्षण, मोफत आरोग्य
अन्न, वस्त्र, निवारा ह्या कालच्या मुलभूत गरजा होत्या. आज त्यासोबतच शिक्षण आणि आरोग्य ह्या देखिल मुलभूत गरजा आहेत. त्यावर होणारा खर्च हा खर्च न मानता ती देशहितासाठी केलेली गुंतवणूक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यासाठी हवी तेवढी तरतूद सरकारने केली पाहिजे. शिक्षण आणि आरोग्य या बाबतीत संपन्न असल्याशिवाय कोणताही देश पुढे जाऊच शकत नाही.

८. एक गाव, एक परिवार
एक गाव, एक परिवार ही भावना जनतेमध्ये जागी होणे गरजेचे आहे. एक दुसऱ्याशी असलेली भांडणे, विवाद, मतभेद मिटवावे लागतील. हेवेदावे, द्वेष संपवावे लागतील. त्याशिवाय गावाच्या विकासाला गती येणार नाही. अनावश्यक स्पर्धा आणि परस्पर अविश्वास यामुळे देशाचं वाटोळं झालं आहे. हे काम संतांनी अविरत सुरू ठेवलं होतं. त्यातूनच खरे संस्कार आपल्या मनावर, समाजावर झालेले अपल्याला दिसतात.
९. युवा भारत, नवा भारत
पक्ष कोणताही असो, अलिकडच्या राजकीय नेत्यांची दृष्टी तेवढी प्रगल्भ दिसत नाही. कोणत्याही पक्षाकडे दूरदर्शी कार्यक्रम नाही. घराणेशाहीमुळे राजकारणात स्वतंत्र विचाराच्या, नव्या दमाच्या तरुणांना संधी नाही. सहभाग नाही. तो वाढवावा लागेल. किमान ३० टक्के जागा तरुणांच्या हातात असायला हव्यात. त्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही.
१०. गतिशील न्यायालये, पारदर्शी न्याय
विद्यमान संसदेमधे ४१ टक्के खासदारावर आतंकवाद, खून, अपहरण, बलात्कार, दरोडा यासारखे आणि इतरही गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. राजकारणाचे अपरधिकरण झपाट्याने होत आहे. ह्या केसेस २०/२५ वर्षे चालत असतात. त्यामुळे गुन्हेगार आणखीच बेफिकीर होतात. हे थांबवायचे असेल तर न्याय पारदर्शी असावा आणि तो त्वरित मिळाला पाहिजे. त्यासाठी जे लोक निवडणूकीत उमेदवारी अर्ज भरतील, त्यांच्यावरील केसेस अतिशीघ्र न्यायालयात चालविल्या गेल्या पाहिजे. पहिले सहा महिने खालचे कोर्ट, सहा महिने हायकोर्ट आणि सहा महिने सुप्रीम कोर्ट असा निकाल लावण्याची तरतूद केली गेेली पाहिजे. असे होणार असेल तर कुठलाही गुन्हेगार निवडणुकीचा फॉर्म भरण्याची हिम्मत करणार नाही.
११. प्रगत महिला, समर्थ समाज
महिलांची संख्या जवळपास पन्नास टक्के आहे. म्हणजेच मतदार देखिल तेवढेच. तरीही महिलांना सत्तेत उचित प्रतिनिधित्व मिळत नाही. इतर क्षेत्रातही त्यांना सन्मान मिळत नाही. देशाची अर्धी लोकसंख्या जर कमजोर असेल, तर देशाच्या प्रगतीला फटका बसणे अपरिहार्य आहे. म्हणून महीलांना सक्षम करणे गरजेचे आहे. प्रबोधन करणे गरजेचे आहे. त्यांच्या विचारात अमुलाग्र परिवर्तन घडवून आणावे लागेल. तशा योजना आखाव्या लागतील. महिला सक्षम असतिल, तर समाजही सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही.

१२. सर्वसमावेशक समाज, सर्वसमावेशक सत्ता
असंख्य जाती, असंख्य भाषा, अनेक धर्म, अनेक प्रांत असलेला हा खंडप्राय देश आहे. विभिन्न संस्कृती आहे. त्या सर्वांचा आदर करणारा, सर्वसमावेशक समाज आपल्याला निर्माण करावा लागेल. एकदा समाज सर्वसमावेशक झाला की त्याचे प्रतिबिंब आपोआपच राजकारणात देखील पडल्याशिवाय राहणार नाही.

अर्थात् लढाई मोठी आहे. कण एवढे सोपे देखिल नाही. पण ते हाती घेतल्याशिवाय गत्यंतर देखिल नाही. आपल्याला खरंच हा देश वाचवायचा आहे का ? लोकशाही वाचायची आहे का? आपले संविधान वाचवायचे आहे का ?
तुमचे उत्तर ’होय’ असेल.. तर फक्त एवढं करा..

• आपण सैतानाच्या तावडीत सापडलो आहोत, हे खरं असलं तरी, ‘सैतानाला पराभूत करणं अशक्य आहे’ या न्यूनगंडातून बाहेर या.
• ‘पर्याय कोण’ असले बालिश प्रश्न विचारू नका. विकृतीला समूळ नष्ट करायची असते. तिला पर्याय शोधायचा नसतो. आणि परिस्थितीनुरुप योग्य पर्याय आपोआप समोर येत असतो. चिंता करू नका.
• ही समस्या दोन/चार विकृत लोकामुळे निर्माण झाली, असं नव्हे. अख्खा लांडग्यांचा कळप गावातून हाकलून द्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. या बाबतीत स्वतःही कन्फ्युज होऊ नका. इतरांनाही करू नका.
• तुम्ही एकटे आहात, हे मनातून काढून टाका.
• ‘लोक समोर येत नाहीत, लोक घाबरतात, लोक कौरवांच्याच बाजूने आहेत, हे रडगाणं बंद करा.
• ’मी सामान्य माणूस आहे, मी काय करू शकतो ? माझ्या हातात काय आहे ?’ हे पालुपद बंद करा. देशात लोकशाही आहे आणि एक व्यक्ती एक मत, ह्या सूत्रात प्रचंड मोठं सामर्थ्य आहे, याची जाणीव ठेवा. हे सर्वात आधी तुमच्या जवळच्या लोकांना पटवून द्या. घरच्या लोकांना पटवून द्या.
• तुम्ही त्रस्त आहात, तसेच शेकडो, हजारो, लाखो, करोडो लोकही परेशान, अस्वस्थ आहेत, याची खात्री बाळगा.

• ‘मी यांच्याशी लढणार आहे. मी या देशद्रोही गँगला कुठल्याही परिस्थितीत मतदान करणार नाही’ असा निर्धार करा. तशी शपथ घ्या. मित्रांना, नातेवाईकांना, समाजाला हे ठासून सांगा. पुन्हा पुन्हा सांगत रहा. त्यांनाही तसे करायची विनंती करा.
• सैतानाच्या कळपात काही लोक स्वार्थापोटी तर काही भीतीपोटी सामील झालेले असतात. काही लोकांना त्यांची घोडचूक लक्षात येत आहे. अशा लोकांशी जरा सबुरीने वागा. त्यांना हिडीस फिडीस करू नका. चुका प्रत्येकाच्याच होत असतात. (मात्र कितीही मोठे असले तरी तुम्ही त्यांच्या आहारी जाऊ नका. पुन्हा त्यांच्या नादी लागू नका. त्यांच्यापासून सतत सावध रहा.)
• मात्र जे अगदीच मूर्ख आहेत, अंधभक्त आहेत, त्यांच्याशी ताबडतोब संबंध तोडा. उगाच त्यांना वाईट वाटू नये म्हणून गोड बोलू नका किंवा वादही घालू नका. प्रश्न देशाच्या अस्तित्वाचा, सामाजिक समतेचा, बंधुभावाचा आहे, हे ध्यानात ठेवा. अशा अंधभक्तांना आपल्या फ्रेंडलिस्ट मधून ताबडतोब कमी करा.
• जो देशाचा विचार करू शकत नाही, जो स्वार्थासाठी देशाशी गद्दारी करतो, तो तुमचाही होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या.

• हे करत असताना कोणत्याही विशिष्ट जाती समूहाला सरसकट टार्गेट करू नका. इतरांनाही तसे करू देवू नका. स्वार्थी, बदमाश लोक सर्वत्रच आहेत. ते आपल्याही जातीसमूहात आहेत, याचे भान ठेवा. दोषी लोकांचा विरोध करा. सरसकट कोणत्याही जाती समूहाचा नाही.
• जो समूह पुढे असतो, त्यातील काही लोक चांगल्या कामात पुढे असतात, तर काही वाईट कामातही पुढे असतात. त्यामुळे वाईट लोकांच्या चुकासाठी संपुर्ण समूहाला बदनाम करू नका. त्यामुळे त्यातला चांगल्या आणि प्रामाणिक लोकांचा आपण मानभंग करत आहोत, त्यांच्यावर अन्याय करत आहोत, हे लक्षात घ्या. म्हणून अशी चूक करू नका.

• एखादी व्यक्ती आपल्या जातीची आहे, नात्यातली आहे, आपल्या भाषेची, प्रदेशाची आहे, एवढ्या कारणासाठी त्याचे गुन्हे, अपराध पाठीशी घालू नका. त्यातूनच नवे भस्मासुर पैदा होतात, याचे भान ठेवा. वाईटाचा सदैव स्पष्टपणे विरोध करा.
• दलाल मीडियावरील बातम्या पाहणे बंद करा. अशा चॅनेलवर बहिष्कार टाका. सोशल मीडियाचा वापर करा. योग्य आणि निष्पक्ष बातम्या देणारे YouTube चॅनल कोणते आहेत, त्याची माहिती एकमेकांना द्या. असे बरेच चॅनल्स आहेत. त्यांना सबस्क्राईब करा. शक्य तेवढे आर्थिक सहकार्य करा.

• घरात बसून किंवा फुकटात क्रांती होईल, ही मानसिकता नेहमीसाठी सोडून द्या. देशासाठी, पुढील पिढ्यांसाठी त्याग करायला शिका.
• चुका इतरांच्या होतात, तशा आपल्याही होऊ शकतात. आत्मचिंतन करा. झालेल्या चुका मोकळेपणाने मान्य करा. दुरुस्त करून पुढे जाण्याचा प्रयत्न करा.
• एक दिवस सर्वांनाच मरायचे आहे. पण इतिहास मात्र लढणारांची अभिमानाने नोंद घेतो, याची जाणीव ठेवा. कुत्र्या-मांजरासारखी लाचारी पत्करून रोज रोज मरण्यापेक्षा स्वाभिमानाने जगायला शिका.
• देश माणसांनी बनतो. माणसाची सेवा, त्याचे हित म्हणजेच राष्ट्रहित, तीच खरी देशभक्ती आहे. नदी, नाले, पहाड, जंगल, गाय, बैल ही देशाची संपत्ती आहे. या संपत्तीची काळजी जरूर घ्या. पण माणसांना उपाशी ठेवून जनावरांची, नदी – नाल्यांची पूजा करणे, हा शुद्ध मूर्खपणा आहे. त्यांची स्वच्छता वेगळी, काळजी घेणे वेगळे आणि पूजा करणे वेगळे, याचे भान असू द्या. असल्या कारस्थानात सहभागी होऊ नका.

पुन्हा घ्यायचे शस्त्र हातात आणि
पुन्हा माणसांची लढू या लढाई
मनाला पुन्हा धार लावू नव्याने
मनासारखे शस्त्र कोठेच नाही!

ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष,
लोकजागर – 9822278988
•••
• ’लोकजागर’ मिशन समजून घेण्यासाठी ‘समतावादी हिंदू धर्म आणि नवा भारत’ हे पुस्तक वाचा. इतरांना भेट द्या.
• पुस्तकांसाठी संपर्क – 9503144234 (पता आणि पैसे भरल्याचा स्क्रीन शॉट व्हॉट्स ॲप करण्यासाठी)
• फोन पे साठी – 9822278988
• किंमत – २८० + ३० पोस्टेज = ३१० मध्ये घरपोच
•••
टीप – माझा सोशल मिडीयावरील कोणताही लेख/कविता/साहित्य सामाजिक हेतूनं (व्यावसायिक उपयोग वगळून) अर्थातच.. माझ्या नावाने.. सोशल मीडिया किंवा अन्यत्र प्रकाशित करण्यासाठी, शेअर करण्यासाठी खुली परवानगी आहे. वेगळ्या परवानगीची गरज नाही.
•••
संपर्क –
लोकजागर अभियान
• 8275570835 • 8605166191• 9422154759 • 9773436385 • 8806385704 • 9960014116