हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ गोंदियात ‘जनआक्रोशʼ
◼️सकल हिंदू समाजाच्या हाकेवर हजारो लोक उतरले रस्त्यावर
गोंदिया : बांगलादेशात नुकत्याच काही महिन्यापूर्वी झालेल्या शेख हसीना यांच्या सत्तांतरानंतर तेथील हिंदूंवर सातत्याने होत असलेला हल्ल्या व महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ गोंदियात रविवार २२ सप्टेंबर रोजी जन आक्रोश रैली काढण्यात आली. यावेळी हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून रॅलीत सहभागी झाले होते. दरम्यान बांगलादेशवर कारवाई करण्याची मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली.
रविवारी सकाळी १० वाजता आंबेडकर चौक परिसरातून जन आक्रोश रैलीला सुरुवात करण्यात आली. दरम्यान, जयस्तंभ चौक होत शहरातील गांधी प्रतिमा, चांदणी चौक, दुर्गा चौक, गोरेलाल चौक, नेहरू चौक मार्गावरून भ्रमण करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात पोहचली. यावेळी राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप करण्यात आला.
बांगलादेशात सत्ता पालट झाल्यानंतर तिथे अल्पसंख्यक हिंदूंवर अन्याय करीत त्यांच्या घरांची जाळपोळ, दुकानांची लुटपाट, हिंदू मंदिरांची तोडफोड आणि महिलांवर अत्याचाराची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. तेव्हा भारत सरकारनी हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी हिंदू संघटना सातत्याने करत आहेत. या अनुषंगाने गोंदियातही बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने जनआक्रोश रैलीचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, आयोजित जनआकोश रॅलीत सहभागी होण्यासाठी रविवारी सकाळ पासूनच जयस्तंभ चौक परिसरात नागरिकांची गर्दी होऊ लागली होती. काही वेळातच गर्दीला जनसागराचे स्वरूप आले. त्यानंतर हजारोंच्या संख्येने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातून नागरिक गण हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांचा जाहीर निषेध करत जनआक्रोशरॅलीत सहभागी होत ” बांगलादेश मुरदाबादच्या घोषणाबाजी करण्यात आल्या. यावेळी जिल्हा पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रत्येक चौकात विविध संघटना कडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती.
◼️हातात फलक, डोळ्यात राग..
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ रविवारी सकल हिंदू समाजाच्या हाकेवर ७२ हून अधिक सामाजिक, धार्मिक आणि हिंदू संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार थांबविण्याची मागणी करणारे फलक त्यांच्या हातात असतानाच बांगलादेशच्या विरोधात रागही त्यांच्या डोळ्यात दिसत होते.
◼️शहर झाले भगवामय…
जनआक्रोश रैलीत हजारो नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. सकाळपासूनच शहरातील जयस्तंभ चौकात नागरिक एकत्र आले. दरम्यान, शेकडो फलकांसह हजारो भगवे ध्वज घेऊन शहरातून मोर्चा काढण्यात आला. यावेळी संपूर्ण शहर भगवामय झाले होते.
००००००