नवेगावबांध-गोठणगाव मार्गावरील पुल खचला!◼️अनेक गावांचा संपर्क तुटला
गोंदिया : जिल्ह्यात संततधार पावसामुळे अनेक मार्ग बंद झाले असतानाच पावसामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध ते गोठणगाव मार्गावरील पुल खचल्याने या मार्गावरील वाहतुक बंद झाली आहे. त्यातच गोठणगाव परिसरातील अनेक गावांचा नवेगावबांधशी संपर्क तुटला आहे.
जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून पावसाने मुक्काम ठोकला आहे. दर दिवशी पावसाची रिपरिप कायम असतानाच अधूनमधून जोरदार पावसाची नोंद होत आहे. त्यामुळे नदी नाले ओसंडुन वाहत आहेत. तर जिल्ह्यातील धरणही 100 टक्के भरल्याने ओव्हरफ्लो झाले आहे. विशेषत: अर्जुनी मोरगाव तालुक्यात सतत पाऊस पडत असल्याने संपूर्ण तालुका जलमय झाला असून जमीन सुद्धा दलदल झाली आसे. पावसामुळे अनेक रस्ते बंद आहेत. त्यातच रात्रीच्या सुमारास नवेगावबांध ते गोठणगाव मार्गावरील गोठणगाव तलावाजवळील नाल्यावरील पूल अचानकपणे खचला. सुदैवाने यावेळी या मार्गावरून रहदारी बंद असल्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
मात्र, पूल खचल्याने गोठणगाव – नवेगावबांध मार्गावरील वाहतुक बंद झाली आहे. तर या मार्गावरील अनेक गावांचा नवेगावबांध व गोठणगाव या गावांशी संपर्क तुटला आहे. तेव्हा सदर मार्गाचे लवकरात लवकर बांधकाम करुन रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी बांधकाम विभागाकडे केली आहे.
◼️नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा …
गोठणगाव ते नवेगावबांध मार्गावरील पुल कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. दरम्यान, नवेगावबांध ते गोठणगाव ये-जा करण्यासाठी परिसरातील कवठा किंवा खैरी/सुकळी मार्गाचा अवलंब करुन काळीमाती मार्गे वाहतुक करता येणार आहे. तेव्हा नागरिकांनी या मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
● वरुणकुमार सहारे, उपविभागीय अधिकारी, अर्जुनी मोरगाव
०००००००००