डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट; बौद्ध समाजात संताप, पुलगाव पोलिसांनी केली FIR दाखल!
पुलगाव (दि. १८ एप्रिल) – संविधान निर्माता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गोंदियात झालेला अपमान शांत होत नाही लगेच पुलगाव येथील एका तरुणीने सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट केल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित पोस्ट एका मुलीने केली असून, यामुळे बौद्ध समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.आरोपी महिला दिक्षा वाघमारे असल्याचे समजले. पुलगाव पोलिसांत तिच्यावर fir दाखल झाल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच अनेक नागरिकांनी पुलगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. समाजबांधवांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील चौकशी सुरू आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सदर पोस्ट हटवण्यात यश मिळवले आहे.
या प्रकारामुळे समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटत असून, नागरिकांनी संयम बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पुलगाव शहरात सध्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
दरम्यान, शहरातील विविध संघटनांनी या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलीस प्रशासनाकडून देखील या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.
महिलांच्या हक्कांचे खरे शिल्पकार – डॉ. बाबासाहेब आंबेडकर; आणि आज एक महिला त्यांचाच अपमान करते!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे, विशेषतः महिलांचे खरे मुक्तिदाते होते. त्यांनी आयुष्यभर समाजातल्या शेवटच्या घटकासाठी संघर्ष केला, आणि त्यात महिलांची बाजू अधिक ताकदीनं मांडली. स्त्रियांचं शिक्षण, त्यांचा सन्मान, त्यांचे हक्क, आणि त्यांची आर्थिक-सामाजिक सुरक्षा यासाठी बाबासाहेबांनी अनेक कायदे आणि योजना आखल्या. भारतीय राज्यघटनेत समानता, स्त्री-पुरुष समान वेतन, संपत्तीतील हक्क, घटस्फोटाचा अधिकार, मुलांवर पालकत्वाचा अधिकार हे सगळे बाबासाहेबांच्या विचारसरणीचे फलित आहे.
त्यांनी हिंदू कोड बिलासारखा क्रांतिकारी कायदा आणला, जो महिलांना वारसाहक्क, विवाहात समान अधिकार, आणि घटस्फोटासारखे वैध पर्याय देतो. तेव्हा बाबासाहेबांना विरोध करणारे पुरुषच नव्हते, तर तत्कालीन व्यवस्थेचा एक मोठा भाग त्यांच्या या विचारांचा विरोध करत होता. पण तरीही त्यांनी एक पाऊल मागे न घेता महिलांसाठी कायदेशीर हक्क मिळवून दिले.
आणि आज – २१व्या शतकात, शिक्षित समाजात – जर एखादी महिला सोशल मीडियावर बाबासाहेबांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करते, तर हा केवळ त्यांचा अपमान नसून त्या लाखो महिलांचा देखील अपमान आहे, ज्यांना बाबासाहेबांनी मानाचं, स्वतंत्र विचाराचं आणि अधिकाराचं जीवन जगायला शिकवलं.
हा अपमान केवळ वैयक्तिक मत किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून न पाहता, सामाजिकदृष्ट्या तो अत्यंत गंभीर आहे. बाबासाहेब हे एक व्यक्ती नव्हते – ते एक विचार होते, आणि आहेत. त्यांच्या कार्यामुळेच आज आपण अनेक मूलभूत हक्क आणि समानतेच्या गोष्टी सहजतेनं गृहित धरतो.
<span;>आज गरज आहे की नव्या पिढीने इतिहास समजून घेतला पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ दुसऱ्याच्या भावनांवर घाव घालणं नसून, आपलं मत जबाबदारीने मांडणं असं असायला हवं.
बाबासाहेबांच्या कार्याचा आणि संघर्षाचा आदर करणं, ही आपल्या समाजाची आणि प्रत्येक स्त्रीची नैतिक जबाबदारी आहे.
बाबासाहेब यांनी मानणाऱ्या अनुयायी यांनी शांतता राखावी व पोलिसांनी आरोपी महिलेवर कडक कारवाई करावी अशीच मागणी आता होत आहे. या संदर्भात माहिती घेण्यासाठी पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांना फोन केला असता त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही.